पावसाळा आला, घ्या आरोग्याची काळजी

जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि काय काळजी घ्यावी

0

पावसाळा आला की अस्वच्छतेमुळे रोगराई झपाट्याने वाढते आणि बारीक-सारीक आजारांना निमंत्रण मिळते. अशुद्ध पाणी अनेक आजार सोबत घेऊन येतं. यावर आळा घालण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात कचरा, पाणी साचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. म्हणून आम्ही यंदाच्या पावसाळ्यात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये याच्या काही टीप्स देणार आहोत.

पावसाळ्यात घ्यावयाची काळजी:

– पावसात भिजणे शक्यतो टाळा आणि भिजल्यास कोरड्या टॉवेलनं अंग पुसून घ्या
– ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहू देऊ नका
– पावसातून बाहेरून घरात आल्यावर आधी पाय स्वच्छ कोरडे करावेत. तसेच ओले मोजे वापरू नयेत.
– पावसात भिजल्यास घरी आल्यावर प्रथम अंघोळ करून मगच कोरडे कपडे घालावेत.
– अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकल्यास त्वचेला होणारा जंतुसंसर्ग काही प्रमाणात टाळता येतो.
– केस व कपडे ओले असताना वातानुकूलित जागेमध्ये जाण्याचे टाळावे. त्यामुळे व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकला असे आजार होण्याची शक्‍यता असते.
– डास निर्मूलनासाठी विविध उपाययोजना कराव्यात.
– नियमितपणे अंगाला तिळाचे तेल कोमट करून लावावे.

आहारविषयक घ्यावयाची काळजी:

– भेळपुरी, पाणीपुरी, भजी, सॅंडविच इत्यादी बाहेरचे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
– बर्फाचा गोळा, रस्त्यावर मिळणारे फळांचे रस आणि कुल्फी असे पदार्थ टाळावेत.
– तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
– मांसाहार करणाऱ्यांनी या काळामध्ये मासे खाणे टाळावे, कारण हा माशांचा प्रजोत्पादनाचा मोसम असतो, त्यामुळे पचनसंस्थेला जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता असते.
– आंबट, शीत पदार्थ टाळावेत.
– पावसाळ्यात नेहमी आरोग्यकारक, चांगले शिजवलेले आणि गरम असे घरचेच जेवण घेणे हितकारक ठरते.
– नेहमीच्या चहाऐवजी जर औषधी चहा, Green Tea घेतला तर आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. कॉफीमुळे Dehyadration होत असल्यामुळे कॉफी घेणे टाळावे.
– प्यायचे पाणी शुद्ध करण्यासाठी water प्युरिफायरचा वापर करावा. ते शक्‍य नसल्यास पाणी गाळून उकळवून मगच पिण्यासाठी वापरावे.
– अन्नपचन नीट व्हावे, यासाठी या काळात भरपूर पाणी पिणे योग्य ठरते.
– बाहेर पाणी पिणे शक्‍यतो टाळावे. बाहेर पडताना नेहमी आपली पाण्याची बाटली जवळ ठेवावी.

Leave A Reply

Your email address will not be published.