हुंडा,लग्न, बोळवण, तेरवी,दारोदारी फिरवी.

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: विषबाधा, गुलाबी बोंड अळी, अत्यल्प पावसाळा, कर्जमाफी न मिळणे या जीवघेण्या चक्रव्युहात सापडलेले मारेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव. विषबाधेने मृत पावलेल्यांना सरकार मदत देतं. बोंडअळीच्या प्रकोपात सापडलेल्यांना सरकार भरपाई  कधी देणार. कर्जमाफीची अनिश्चितता अनेक शेतकऱ्याना न मिळालेली कर्जमाफी स्वस्थ झोपू देत नाही. या सर्व बाबींची बोंब विरोधातील राजकिय नेत्यांच्या सहकार्याने शेतकऱी आर्थिकदृष्टया खचून आत्महत्तेच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र विरोधी राजकारणी उभे करत असताना, आज तालुक्यात सत्तर टक्के शेती करणारा शेतकरी आपल्या मुला, मुलीचे लग्न, घरच्या प्रियजनाची तेरवी, मामा आपल्या भाचा, भाचीचे बोळवण कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करुन आपल्या गेलेल्या पाटिलकीचे प्रदर्शन दाखविण्याचा प्रयत्न जरी करीत असला तरी, इकडे मायबाप सरकार शेतकऱ्यांना मदत देत नाही असी बोंब ठोकून, लग्न साक्षगंध, लग्न समारंभ, तेरव्या व इतर कार्यक्रमात अमाप खर्च करणारा समाज आज या अवाढव्य खर्चाला मॅनेज करून कर्जाचा आलेख वाढतच गेल्याने मारेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्तेचा आकडा फुगला.

 

कर्जमाफी मागणारे राजकीय नेते, शेतकरी कृषी मालाला उत्पन्न खर्चावर ५०% अधिक भाव द्या अशी मागणी का करीत नाही, असा प्रश्न पडत असला तरी आज कृषीचे उत्पन्न वाढले असल्याचा प्रत्येय तूर खरेदी केन्द्रावर त्याचा अनुभव शेतकरीच घेत आहे. कारण तूर विकताना शेतकऱ्यांच्या सातबारावर हेक्टरी मर्यादा देऊन तूर खरेदी केली जाते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून समजा काही शेतकऱ्यांना जास्त तूर उत्पन्न होते तेव्हा शेतकऱ्यांची तारांबळ होऊन जादा पिकलेली  तूर घेण्यास शासन मनाई करते. अशी शासनव्यवस्था आणि आपल्या मुला, मुलीच्या लग्नात अवाढव्य हुंडा, नातेवाईक महिलांना साड्या नेसवणे, त्यातून न खपणारा जुना कपडा शेतकरी वर वधू पित्याच्या माथी मारण्याच्या प्रकाराने शेतकरी बांधब अनिष्ट प्रथेला व खोट्या प्रतिष्ठेला बळी पडत आहे. भटजीकडून काढलेली लग्नघटिका केवळ पत्रिकेत लिहण्यापुरती असून ९९% लग्न तास, दोन तास उशिरा लागते.

 

४४ डिग्री तापमानात वरातीत रस्त्यावर नाचणारे वराकडील महिला पुरुष नातेवाईक बँडचा पैसा खंडविण्यासाठी स्वताचीच शेकून घेतो. त्यामुळे पर्यायाने लग्न घटिका टळून वधुपित्याने केलेले सुरुची जेवणाची चव कुरुची होते. याला कारण आपणच आहोत हे ज्या दिवसी जाणीव होईल, त्या दिवशी ह्या लग्नसोहळ्यात वेळेला महत्व देऊन जो शेतकरी बांधव एका दाण्याचे हजार दाणे करुन जगाचा पोशिंदा ठरला त्या दिवसी लग्न सोहळ्यात हजारो टन धान्याच्या अक्षता आज उधळतो ते बंद करुन खर्या अर्थाने जगाचा पोशिंदा ठरेल. विवाह हा संस्कार कौटुंबिक आहे. परंतु आज विवाह सोहळ्यात हजारो लोक सामील होऊन वधुपित्याचं लग्न नियोजन बिघडविण्याचं काम सुरु असून त्याला कारणीभूत वर आणि वधूपक्षाकडील मंडळीच जबाबदार आहे. कारण लग्न सोहळा हा आनंदाचा सोहळा असल्याने आनंदातच व्हायला हवा.

 

अलीकडे लग्नसोहळ्यात झगडे, मारामारी करण्याच्या प्रकाराने समाज कुठे चालला या बाबीवर चिंतन करण्याची गरज आहे. आज अनेक शेतकरी वधूपिता मुलीचे लग्न करण्यासाठी शेत विकून हुंडा देण्यासाठी व लग्न मोठ्या थाटामाटात करण्यासाठी घराचं खंडार करण्याचा जो आटापिटा सुरु आहे तो बंद जर नाही केला तर, अशा कितीही शासनाने कर्जमाफी योजना आखल्या तरी शेतकरी संतुष्ट होणार नाही. म्हणून समाजाला जर आर्थिक संपन्नता आणायची असेल तर सामाजिक समारंभाच्या खर्चावर मर्यादा आणावीच  लागेल. तेव्हाच हुंडा, बोळवण, तेरवी सारख्या अनिष्ट प्रथा जीवघेण्या ठरणार नाही आणि शासनाला कर्जमाफीची गरज  भासणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.