सरपंचाच्या स्वाक्षरीने चेतना अभियानातील निधीची उचल

मांडवाच्या सरपंचांची बीडीओकडे तक्रार

0

सुशील ओझा, झरी: बळीराजा चेतना अभियानातील निधीची उचल चक्क सरपंचाच्या खोटी स्वाक्षरी करून केल्याची घटना मांडवा ग्रामपंचायतीत घडली आहे. सचिव व शिपायाने हा प्रताप केल्याची तक्रार महिला सरपंचाने बीडीओंकडे केली आहे.

नापिकी व कर्जबाजारीपणाने नैराश्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान सुरू करण्यात आले. गावपातळीवर सरपंचाच्या अध्यक्षतेखालील समितीकडे शेतकरी हितासाठी निधी देण्यात आला. मात्र मांडवा गट ग्रामपंचायतच्या सचिव व शिपायाने या अनुदानात गैरप्रकार केल्याचे पुढे आले आहे..

मांडव्याच्या सरपंच अंजना टेकाम यांना चेतना अभियांनाची माहिती सचिवांनी दिली नाही. सचिव व शिपायाने संगनमतातून सरपंचाच्या खोट्या स्वाक्षऱ्या व शिक्के मारून परस्पर धनादेश वाटप केल्याचे उघडीस आले. याबाबत सरपंच टेकाम यांनी बीडीओंकडे तक्रार केली आहे.

गावातील पैकू पोतू टेकाम यांच्या नावाने शेती नसताना त्याला ५ हजाराचा धनादेश सचिवांनी दिला. त्यावरून सरपंच टेकाम यांनी झरीतीलग्रामीण बँकेत जाऊन लाभार्थ्यांची विचारणा केली. शिपाई सुरेश आत्राम यांनी ५०० दिले व बँकेतून पैसे काढून (विड्रॉल) दिल्याचे सांगितले. यापूर्वी सचिव शेळमाके व शिपाई सुरेश यांनी मोठी अफरातफर केल्याची शंका सरपंचांनी उपस्थित केली.

अन्य योजनातही घोटाळ्यांची शंका
ग्रामसभा अथवा दवंडी न देता परस्पर सरपंचाच्या खोट्या स्वाक्षऱ्या मारून सचिव व शिपायाने धनादेश वितरीत केले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या अन्य योजनांमध्येही घोटाळ्यांची शंका सरपंचांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी झालेल्या १४ वा वित्त आयोग, नरेगा, पेसा अंतर्गतच्या कामासाठी किती निधी आला व किती खर्च झाला, याची माहितीही टेकाम यांनी बीडीओंकडे मागितली आहे. बोगस ५ हजारांचा धनादेश सरपंचांकडे असून, त्यांनी पासबुकवरील एंट्रीची मागणीही केली आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.