साखरा येथे कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट

कचराकुंड्या तुंबल्या, कचरा रस्त्यावर

0

वणी (विलास ताजने): वणी तालुक्यातील साखरा (कोलगाव) गावात प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनासाठी ग्रामपंचायतच्या वतीने कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. मात्र कुंड्यातील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्या जात नाही. परिणामी ग्रामस्थांना अस्वच्छतेचा सामना करावा लागतो.

गावात स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने हनुमान मंदिराच्या जवळील रस्त्यावर दोन कचराकुंड्या ठेवल्या. कचराकुंडीतील कचऱ्याची वेळोवेळी विल्हेवाट लावून कुंड्या रिकाम्या करणे गरजेचे असते. मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी सदर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. हवेचा वाहण्याचा वेग वाढताच कचरा सर्वत्र पसरतो.

पाळीव गुरांना व्यवस्थित प्रकारे चारा-पाणी मिळत नाही. त्यामुळे गुरे कचराकुंड्यावर चरताना आढळतात. अशा चरण्यामुळे खाण्यातून प्लास्टिक गुरांच्या पोटात जाऊन गुरे आजारी पडतात. म्हणून भरलेल्या कचराकुंड्या रिकाम्या कराव्या. जमिनीवर विखुरलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. अशी नागरिकांची मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.