बिलकीस बानो गँगरेप प्रकरणातील आरोपींच्या सुटकेचा एआयएमआयएम कडून विरोध

राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्री याना पाठविले पत्र

जितेंद्र कोठारी, वणी :  2002 मध्ये गुजरात दंगली दरम्यान बिलकीस बानो या महिलेसोबत सामूहिक अत्याचार व तिच्या 3 वर्षाच्या मुलीसह कुटुंबियांची हत्या करणाऱ्या आरोपींची कारागृहातुन सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयावर ऑल इंडिया मजलीस-ए- इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. एआयएमआयएमच्या वणी शाखेतर्फे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा याना पत्र लिहून आरोपींची आजन्म कारावासची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

गुजरातमध्ये 2002 च्या दंगलीत दहोद जिल्ह्यातील राधिकापूर येथील गर्भवती असलेल्या बिलकिस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या सर्व 11 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या माफी धोरणांतर्गत 15 ऑगस्ट 2022 रोजी गोधरा उप कारागृहातून सर्व आरोपीची सुटका करण्यात आली.

गुजरात सरकारचा हा निर्णय गुन्हेगारांचा मनोबल वाढवणारा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्री सशक्तीकरण बाबत केलेल्या वक्तव्याचे विरोधात असल्याचा आरोप एआयएमआयएमने केला आहे. एआयएमआयएमचे वणी शहर अध्यक्ष आसिम हुसेन यांनी उपविभागीय अधिकारी वणी मार्फत पत्र देऊन बिलकीस बानो प्रकरणातील सर्व आरोपींना मरेपर्यंत कारागृहाची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

Comments are closed.