वणीत भाजपचा शेतक-यांच्या प्रश्नांवर 30 नोव्हेंबरला आक्रोश मोर्चा

अल्प नुकसान भरपाई, वीज कनेक्शन तोडणीवरून भाजप आक्रमक

जितेंद्र कोठारी, वणी: अतिवृष्टीमुळे मिळणारी अल्प नुकसान भरपाई व महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज कनेक्शन तोडणीवरून भाजप आक्रमक झाली आहे. या दोन्ही प्रश्नांवर वणीत येत्या 30 नोव्हेंबर रोजी उपविभागीय कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

संपूर्ण वणी तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने नुकसान भरपाईसाठी तालुक्यातील सर्व 9 मंडळाचे सर्व्हेक्षण केले. मात्र या 9 मंडळांपैकी शिंदोला व पुनवट या 2 मंडळाच्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले.

कोरोना आणि अतिवृष्टीमुळे वणी उपविभागातील शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय आहे. असे असताना विद्युत विभागाकडून थकीत बिल असलेले शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची जोर जबरदस्तीने वीज कापण्याचा सपाटा लावला आहे. रब्बी हंगामात पेरलेल्या चना व गहू पिकांना पाण्याची गरज असताना वीज तोडणीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून शेतकऱ्यांच्या न्याय व हक्क मागणीसाठी लोकशाही मार्गाने 30 नोव्हेंबर रोजी हजारो शेतकरी भव्य आक्रोश मोर्चा काढणार आहे.

पत्रकार परिषदेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा महामंत्री रवी बेलूरकर, पं. स. सभापती संजय पिंपलशेंडे, भाजप तालुकाध्यक्ष गजानन विधाते, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, श्रीकांत पोटदुखे, संतोष डंभारे, शंकर बांदुरकर, राकेश बुग्गेवार, नितीन वासेकर, विजय गारघाटे उपस्थित होते.

हे देखील वाचा:

भालर येथे दोन तरुणाची एकाला काठीने मारहाण

बुलेटची दुचाकीला धडक, एक ठार व एक जखमी

Comments are closed.