पुनर्वसनावरून चर्चा फिसकटली… राजूर येथील महिलांचे दिवाळीतही आंदोलन सुरूच

घर खाली करण्याच्या नोटीस न देण्याचे SDO यांच्याकडून आश्वासन, मात्र संघर्ष समिती आधी पुनर्वसन करण्याच्या मागणीवर ठाम...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शुक्रवारी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषण मंडपाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट दिली. त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून रेल्वे व वेकोलि अधिकारी यांच्या समक्ष संघर्ष समिती सोबत उपविभागीय कार्यालयात बैठक बोलाविली. या चर्चेत राजूर बचाव समितीचे सदस्य, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, वेकोलिचे क्षेत्रीय प्रबंधक यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र चर्चेत योग्य तो तोडगा न निघाल्याने ही चर्चा फिसकटली. बैठकीत उपविभागीय अधिकारी यांनी रेल्वे व वेकोलि कडून यानंतर घरं खाली करण्याच्या नोटिसा देण्यात येणार नाही तसेच स्थानिक प्रशासन (महसूल व पोलीस) यांना विश्वासात घेतल्या शिवाय विस्थापित केले जाणार नाही अशी भूमिका मांडली. परंतु संघर्ष समिती सदस्य “आधी पुनर्वसन व नंतर विस्थापन” ह्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे कोणत्याही तोडग्याशिवाय चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे ऐन दिवाळीत आंदोलन स्थगित होऊ शकले नाही.

राजूर गावात वेगवेगळ्या कोळसा कंपन्यांच्या कोळसा वाहतूक करण्यासाठी रेल्वेच्या कोळसा सायडिंग सुरू झाल्या आहे. या प्रदूषण निर्माण करणाऱ्या कोळसा सायडिंगला प्रदूषण नियंत्रण बोर्डाची अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी नाही. अनधिकृतपणे सुरू असलेल्या ह्या कोळसा सायडिंगची संख्या वाढविण्यासाठी गावातील रहिवासीयांची घरे खाली करण्यासाठी रेल्वे व वेकोलिने येथे गेल्या 50 वर्षांपासून वास्तव्य करून राहत असलेल्या नागरिकांना नोटिसा देणे सुरु केले आहे.

रहिवासी क्षेत्रालगत ह्या कोळसा सायडिंग उभारण्यात आल्याने गावात प्रचंड वायू, जल व ध्वनी प्रदूषण होत असून येथील नागरिकांना अनेक दुर्धर रोग होत आहेत. ह्यातच घरे खाली करण्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने येथील नागरिकांवर दुहेरी संकटासहित शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास वाढला आहे.

अश्या संकटात सापडलेल्या नागरिकांनी राजूर बचाव संघर्ष समिती चे माध्यमातून एकत्र येत 1) गावातून प्रदूषण निर्माण करणारी व अवैधरित्या सुरू असलेल्या कोळसा सायडिंग गावातून हद्दपार करा, 2) गावकऱ्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावरील जड वाहतूक बंद करा व 3) रेल्वे व वेकोली कडून विस्थापित करण्याअगोदर पुनर्वसन करून नुकसानभरपाई द्या. ह्या मागण्यांसाठी गेल्या 10 महिन्यांपासून अनेकदा निवेदने, दोनदा रास्ता रोको आंदोलन केले व आता दि. 17 ऑक्टो. पासून महिलांचे बेमुदत आमरण उपोषणाला सुरू करण्यात आली. ह्या उपोषणाला वणी विभागातील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

उपोषणाचे सहाव्या दिवशी दिशा अमृत फुलझेले, नाजूका प्रशांत बहादे, वीणा अमर तितरे व शालू संजय पंधरे यांचे उपोषण सुरू आहे.
ह्या बेमुदत आमरण उपोषनाला यशस्वी करण्यासाठी सरपंच विद्या पेरकावार, संघदीप भगत, वृषाली खानझोडे, प्रणिता असलम, अशोक वानखेडे, डेव्हिड पेरकावार, मो. असलम, कुमार मोहरमपुरी, प्रवीण खानझोडे, ऍड. अरविंद सिडाम, जयंत कोयरे, नंदकिशोर लोहकरे, सावन पाटील, प्रदीप बांदूरकर, साजिद खान, अनवर खान, अक्रम वारसी, अभिषेक अंडेल, सनी राजनालवर, अजित यादव, अमृत फुलझेले, नितीन मिलमिले, मनीषा परचाके, अनिल डवरे, दीपाली सातपुते, पायल डवरे, बल्ली यादव, वैभव मजगवली इत्यादी परिश्रम घेत आहेत.

Comments are closed.