अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी व पाठलाग

विवेक तोटेवार, वणी : घराचे बांधकाम सुरू असताना मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाची घरातील अल्पवयीन मुलीवर वाईट नजर पडली. त्यानंतर तो सतत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांनी आपल्या मोबाइल मध्ये तिला नकळत तिचे काही फोटोही काढले. नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार त्रास देत होता. अखेर मुलीने आई वडिलांना सर्व हकीकत सांगितली. पीडित मुलीच्या आईने वणी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादवरून आरोपी मजनूला पोलिसानी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

तक्रारीनुसार फिर्यादी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असून तिच्या घराचे बांधकाम सुरू आहे. आरोपी राहुल बाबाराव धुळे (22) रा. बुरांडा ता. मारेगाव हा मिस्त्री काम करीत होता. यावेळी त्याची वाईट नजर फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर पडली. त्याने आपल्या मोबाईल मध्ये मुलीचे काही फोटोही काढले. काही दिवसानंतर 19 जुलै रोजी मुलगी ही शाळेत जात असतांना आरोपीने तिला रस्त्यात अडविले. मी तुला प्रेम करतो असे सांगून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिची इच्छा नसताना दुचाकीवर बसवून मंदर जवळील निलगिरी बनात घेऊन गेला. त्यानंतर तिला काही वेळाने शाळेत आणून सोडून दिले.

या घटनेनंतर मुलगी पूर्णपणे घाबरली होती. परंतु तिने भीतीपोटी घरी काहीच सांगितले नाही. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने 25 जुलै रोजी पीडितेच्या गावात जाऊन तिचा पाठलाग केला. तिच्यासोबत वारंवार बोलण्याचा प्रयत्न करीत होता. या घटनेनंतर पीडितेने शाळेत जाणेही सोडून दिले. आरोपी कुठेही येऊन आपल्याला त्रास देण्याची भीती तिच्या मनात घर करून होती. चार दिवसांनी जेव्हा आई वडिलांनी शाळेत का जात नाही याबाबत मुलीला विचारणा केली असता पीडितेने सर्व घटना आपल्या पालकांना सांगितली. पीडितेच्या आईने लगेच वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी राहुल धुळे विरुद्ध कलम 354 (अ)(ड), 506 भादवी तसेच बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा 12 (पॉस्को) नुसार गुन्हा दाखल करून लगेच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला वणी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी पाठविण्यात आले. सदर घटनेचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माया चाटसे करीत आहे. 

शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांकडे पालकाने लक्ष देणे आवश्यक

शाळेत शिक्षण घेत असतांना पालकांनी आपल्या पाल्यावर विशेष नजर ठेवणे आवश्यक झाले आहे. कारण हे वय अल्लड असते या वयात तोल जाणे साहजिकच आहे. त्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी ही काय करते याकडे पालकांनी लक्ष देणे आता आवश्यक झाले आहे. ज्यामुळे मुल मुली वाईट मार्गाने जाणार नाही.

Comments are closed.