झरी तालुक्यात विजेचा लपंडाव, जनता त्रस्त

गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

0

सुशील ओझा, झरी: पावसाळ्याची चाहूल लागताच मुकुटबनसह तालुक्यात वितरित होणा-या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. तर कमी वीज दाबामुळे गावे अंधारमय झाले आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गावागावातील पाणी पुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होऊन ती निकामी होण्याची भीतीही निर्माण होत आहेत. तसंच विजेच्या लपंडावामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक उपकरने निकामी होण्याची भीती वाढली आहेत.

सध्या उष्णता कायम असल्याने लहान मुलासह आबालवृद्धांना उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होत असताना दिसत आहे. वीजेच्या खेळखंडोबामुळे लोकांना फॅन आणि कुलरचा वापरही नीट करता येत नाही. त्यामुळे परिसरातील जनता गर्मीने होरपळून निघत आहे. दर पाच-पाच मिनिटात वीज खंडित होत असल्याने नागरिकांत वीज वितरण बाबत संताप व्यक्त केल्या जात आहे.

थोडाही वारा सुटला की लाईन गुल होते. याबाबत विचारणा केली असता वरूनच लाईन गेल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे विजेची समस्या सोडविण्याकरिता कोणतेही लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, समाजसेवक व इतर कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही ही एक शोकांतिका आहे.

तर वीज गुल झाल्यास ती नियमित होण्यास किती वेळ अथवा किती दिवस लागेल याची काहीच शास्वती नाही. विजेच्या लपंडाव दरम्यान गुल झालेला वीज पुरवठा सुरू होण्यास कर्मचारी व अधिकाऱ्यांना संपर्क करण्याशिवाय पर्याय नाहीत मात्र संपर्क केल्यावरही वीज पुरवठा नियमित होण्यास मोठी दिरंगाई केली जात आहे. यामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. तरी तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.