ग्रामसभेला फाटा देऊन तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड

शासनाच्या आदेशाला ग्रामपंचायतीचा हरताळ

0

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठित करावे, असे शासनाचे आदेश आहे. मात्र, अनेक गावात समिती गठित झालीच नसून, ज्या ठिकाणी आहे, त्या गावांमध्ये सुरुवातीचा काळ सोडता समित्यांचे कार्य शून्य आहे. ग्रामसभेला फाटा देऊन तालुक्यातील काही गावांमध्ये एकच व्यक्ती समितीचा अध्यक्ष म्हणून मिरवित आहे. .

तालुक्यात ५५ ग्रामपंचायत व एक नगरपंचायत आहे. तंटामुक्त समितीची निवड ही ग्रामसभेतून व लोकांमधून झाली नसताना राजकारणातून पदावर अधिकार गाजवित असल्याचे पहायला मिळत आहे. हितसंबंधातील व आपल्या गटाला लोकांनाच पदाचा लाभ व्हावा, यासाठी राजकीय मंडळी धडपडत असते. नियमानुसार समितीचे अध्यक्ष व सदस्य ग्रामसभेतून निवडले जाणे अपेक्षित आहे. परंतु सत्ताधारी ग्रामपंचायत गट हा आपल्या सोयीचा व राजकारणात पराभूत व्यक्तीची त्याठिकाणी वर्णी लावत आहे. .

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यासाठी ग्रामसेवकावर दबाव टाकून ग्रामसभा घेण्याचे टाळण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. ग्रामवासीयांना अंधारात ठेऊन एखाद्या दिवशी उशिरा थातुरमातुर ग्रामसभा घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेक गावांमध्ये होत आहे. .

या पदावरील व्यक्ती व्यसन व राजकारणापासून अलिप्त असायला हवी. गावातील तंटे व समस्या गावपातळीवरच सोडवून, समाजाला न्याय देणे हे त्या पदावरील व्यक्तीचे कर्तव्य आहे. यामुळे लोकांचा वेळ व पैसा वाचेल. परंतु आज लोकांच्या तक्रारीचा सपाटा पोलीस स्टेशन व इतर विभागाकडे वाढलेला आहे. यामुळे समित्या नावापुरत्याच असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.