शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस, खरीप पिकांचे नुकसान

मेंढोली येथील शेतकऱ्यांचे कापसाचे पीक उद्धवस्त

0

तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकपरिस्थिती समाधानकारक आहे. मात्र काढणीस आलेल्या खरीप पिकांचे वन्य प्राणी नुकसान करीत आहेत. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. नुकतेच मेंढोली येथील शेतकरी दीपक सुधाकर बलकी यांच्या शेतातील कपाशी पिकांचे रानडुक्करांनी प्रचंड नुकसान केले आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांकडून झालेल्या शेतपिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.

वणी तालुक्यात यंदा सुरुवातीपासून पिकांना पोषक वातावरण आहे. योग्य वेळी पाऊस आणि उघडीप यामुळे पिके चांगलीच बहरली आहे. सोयाबीनचे पीक काढणीस येत आहे. दसऱ्यापर्यंत कपाशीची कापूस वेचणी प्रारंभ होण्याची शक्यता आहे. मात्र रानडुक्कर, रोही आदी वन्यप्राणी पिकांची प्रचंड नासाडी करीत आहेत. कपाशीची झाडे मोडून टाकत आहे. सोयाबीन पिकं नष्ट करीत आहेत. हातात आलेल्या पिकांची वन्यप्राण्यांमुळे नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांत नैराश्य येत आहे.

सर्व गावागावांतील शेतात वन्यप्राण्यांकडून नुकसान केल्या जात आहे. मात्र वनविभागाकडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या जात नाही. संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना वनविभागाकडून पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी दीपक बलकी, दिवाकर पंधरे, विनायक ढवस, भालचंद्र वासेकर, विवेक मुके, योगेश ताजने आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.