तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सततच्या नापिकीमुळे उचलले आत्महत्येचे पाऊल

0

रवि ढुमणे (वणी): वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी तसेच कर्जबाजारीला कंटाळून शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विदर्भात सध्या गुलाबी बोंडअळीने शेतकरी त्रस्त झाला आहे, तर दुसरीकडे सरकार कोपले आहे. अशा परिस्थितीत येथील शेतकरी वैतागून गेला आहे.  अशीच परिस्थिती असलेल्या वांजरी येथील कृष्णा उर्फ पंकज दिलीप जेनेकार (,30) या तरुण  शेतकऱ्याने शेतातील बांधावर असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पंकज चे वडील 7 ते 8 वर्षांपूर्वी वारले होते.  घरात आई आणि भाऊ यांची जबाबदारी पंकज वर होती.  घरचा कर्ता पुरुष या नात्याने तो शेती करीत होता.  सध्या जिकडेतिकडे बोंड अळीने काहूर माजवला आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर, शेतमालाला भाव नाही. त्यामुळे
ओलित असून देखील शेतात लावलेला खर्च सुद्धा निघाला नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा असे अनेक प्रश्न त्याच्या समोर घोंगावत असतानाच आज अचानक पंकज शेतात गेला आणि बांधावर असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी शेतात धाव घेतली. पोलिसांना कळविले.  पोलिसांनी पंचनामा करून पंकज चा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. एकीकडे निर्सग कोपला तर दुसरीकडे सरकार या परिस्थितीत विदर्भातील शेतकरी मरण यातना भोगत आहे. मात्र सरकार अद्याप तरी शेतमालाला योग्य बाजारपेठ अथवा रास्त भाव देत नाही त्यामुळेच असे अनुचित प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.