कधी घेणार उर्वरित शेतक-यांची जमीन? वेकोलिविरोधात शेतकरी संतप्त

600 एकरचा प्रश्न अद्याप बाकीच.. विविध मागण्यांसाठी सोमवारपासून उपोषण

बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण व योग्य मोबदला मिळाला नाही. तसेच उकणी गावातील 14-15 टक्के जमीन अद्यापही वेकोलिने संपादित केली नाही. त्याचा सुमारे पावने 200 शेतक-यांना फटका बसला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. येत्या आठवड्यात मागण्या मान्य न झाल्यास उकणी येथील पीडित शेतक-यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी पासून चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जाग्राम टाडाळी येथील क्षेत्रिय महाप्रबंधक कार्यालयासमोर ते आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. या प्रश्नी पीडित शेतक-यांनी कामगार व शेतकरी नेते संजय खाडे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. संजय खाडे यांनी शेतक-यांच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवित त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे वचन दिले.

मौजा उकणी, बेलसणीसह परिसरातील शेकडो एकर जमीन वेकोलिने संपादित केली. त्यातील उकणी या गावाची पुनर्वसन प्रकिया शेवटच्या टप्पात आहे. मात्र उकणी, खंड नं.1 मधील उर्वरित जमीन अद्यापही संपादीत केली गेली नाही. याचा सुमारे 175 शेतक-यांना बसला आहे. ही जमीन विनाअट निलजई डीप विस्तारीकरणासाठी तत्काळ संपादित करावी, बांधकाम विभागाने घरांचे मुल्यांकन करताना जो दर लावला आहे तो 10 वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना अतिशय अल्प मोबदला मिळत आहे. या मोबदल्यात घरं बांधणं अशक्य आहे. त्यामुळे 2025 च्या सीएसआर रेट नुसार घरांचे मुल्यांकन करून ज्या दिवशी सेक्शन 11 लागले त्या दिवसच्या बांधकाम मूल्यांकना च्या रेट 12% व्याज दर करण्यात येऊन 2025 पर्यंत रक्कम देन्यात यावी शेतक-यांना योग्य मोबदला द्यावा, भुधारकांना मोबदला व नोकरी द्यावी. अशी मागणी वेकोलिच्या क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेतक-यांच्या मागण्या रास्त – संजय खाडे
जमीन म्हणजे शेतकऱ्यांचा प्राण आहे. आपल्या परिसरातील नागरिकांची उपजिविका ही शेतीवरच अवलंबून आहे. मात्र अनेक शेतक-यांच्या जमिनी संपादीत करणे बाकी आहे. शेतक-यांनी वेकोलिला आपली जमीन व घरं दिलीत. मात्र प्रशासन योग्य मोबदला न देता सुळावरची पोळी खात आहे. लोकप्रतिनीधी देखील मूग गिळून गप्प आहेत. जगाच्या पोशिंद्याला असे अगतिक होऊ देणार नाही. त्यासाठी कोणत्याही लढ्यासाठी आम्ही सिद्ध आहोत.

यापूर्वी उर्वरित जमीन संपादीत करण्यासाठी, पुनर्वसन व योग्य मोबदल्यासाठी अनेकदा लेखी निवेदन देण्यात आलीत. मात्र त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे अखेर शेतक-यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. निवेदनावर पुरुषोत्तम भुसारी, मंगेश खापणे, सुरेश वी, विलास खापने, अर्जुन खापने, कैलास खरवडे, सुरेश जोगी, नानाजी ढवस, किसन पारशिवे, पद्माकर झाडे, पराग तुराणकर, बालाजी वाढई, विकास लालसरे, संजय बांदुरकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Comments are closed.