चिंचमंडळमध्ये दोन कुटुंबात प्रचंड राडा, 2 महिला व एक पुरुष जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: बुधवारी रात्री चिंचमंडळ गावात दोन कुटु्ंबात मोठा राडा झाला. विशेष म्हणजे हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. एकमेकांना लाठ्यांच्या साहाय्याने एकमेकांना केलेल्या मारहाणीत दोन महिला व एक पुरुष जखमी झाले आहेत. जखमी महिलेतील एक महिलेच्या डोक्याला गंभीर मार असून तिला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या रागातून दोन कुटुंबात हा राडा झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका तक्रारीनुसार, बुधवारी दिनांक 8 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास एका कुटुंबातील 4 आरोपी हे फिर्यादी महिलेच्या घरी गेले व तिथे त्यांनी महिलेसोबत वाद घातला. दरम्यान एका आरोपीने काठीने महिलेच्या डोक्यावर, कमरेवर वार करून जखमी केले. तर इतर आरोपींनी महिलेला शिविगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. दुस-या तक्रारीनुसार फिर्यादी हा बोरी येथील जत्रा करून घरी परत आला असता एका महिलेने फिर्यादीसोबत वाद घातला. हा वाद सुरू असताना महिलेचे नातेवाईक तिची बाजू घेऊन समोर आले व त्यांनी फिर्यादीस काठीने मारहाण केली.

या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. एका कुटुंबातील महिलेच्या तक्रारीनुसार 4 आरोपींवर भादंविच्या 294, 323, 324, 34, 504. 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुस-या कुटुंबाच्या तक्रारीवरून एका व्यक्तीवर भादंविच्या कलम 324, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

काय आहे राड्याची पार्श्वभूमी?
दोन्ही कुटुंब हे चिंचमंडळ येथील रहिवासी आहेत. एका कुटुंबातील एक विवाहितेला पती व दोन मुली आहेत. एक वर्षांआधी या विवाहित महिलेचे शेजारी राहणा-या एका तरुणासोबत सुत जुळले. तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या महिलेने पती व मुलीला सोडून प्रियकरासोबत गावातून पलायन केले. त्यानंतर त्यांनी दुस-या गावात ठिकाणी संसार थाटला. प्रकरण शांत झाले की गावी परत यायचे असा निर्णय या जोडप्यांनी घेतला.

सुमारे एक वर्षांनंतर प्रकरण शांत झाले असे समजून हे जोडपं दोन तीन आठवड्याआधी चिंचमंडळ येथे परत आलं. मात्र या या प्रेमीयुगलांचे गावात राहणे त्यांच्या नातेवाईकांना खटकायचे. महिलेच्या कृत्यामुळे गावात बदनामी होत असल्याच्या समजुतीतून कुटुंबीय अस्वस्थ व्हायचे. अखेर बुधवारी दिनांक 8 मार्च रोजी नातेवाईकांची ही अस्वस्थता बाहेर निघाली. एका कुटुंबातील काही व्यक्ती तरुणास जाब विचारण्यास गेले. त्यातून हा राडा झाल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा:

यशोगाथा: ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्तुंग भरारी

भांडण पाहल्याने तरुणाला गोट्याने व काठीने जबर मारहाण

Comments are closed.