घटस्फोटीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: एका 32 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी 10 वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोटोणी येथे उघडकीस आली. रत्ना वसंतराव वरखडे असे मृत महिलेचे नाव आहे. काही वर्षाआधी तिचा म्हैसदोडका येथील एका व्यक्तीशी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच तिचा कौटुंबीक वादातून घटस्फोट झाला होता. तेव्हापासून म्हणजे गेल्या 5-6 वर्षांपासून ती माहेरी बोटोणी येथे आईवडिलांकडे राहत होती. आज गुरुवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी रत्नाची आजारी आई दुस-या खोलीत होती. तर तिचे वडील शेतात गेले होते. यावेळी संधी साधून रत्नाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रोशनीला एक 7 ते 8 वर्षांची मुलगी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नसले तरी गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. तसेच घटस्फोट झाल्यापासून ती मानसिक तणावात असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक रत्ना हिच्या पश्चात चिमुकली मुलगी, आई, वडील, चार बहिणी व एक भाऊ आहे.

Comments are closed.