एकापाठोपाठ एक वाहने आली… आणि गोवंश तस्करीचा पर्दाफाश

12 जनावरांची सुटका, 4 वाहनचालक अटकेत, एलसीबीची कारवाई

विवेक तोटेवार, वणी: कत्तलीसाठी पिकअप वाहनान निर्दयीपणे नेणा-या 12 जणावरांची सुटका स्थानिक गुन्हा शाखेने (एलसीबी) केली आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी- मुकुटबन मार्गावर पेटूर जवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी 4 वाहन चालकांना अटक करण्यात आली असून त्यांचे वाहन जप्त करण्यात आले आहे.

रविवारी दिनांक 23 जून रोजी वरोरा, वणी, मुकुटबनमार्गे अदिलाबाद येथे कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने एलसीबी पथकाने पेटूर गावासमोर नाकाबंदी केली. सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान, वणीकडून एका पाठोपाठ एक असे 4 पिकअप वाहने आली. या वाहनाची पाहणी केली असता, त्यात 12 गोवंशीय जनावरे कोंबून आढळली.

पोलिसांनी पिकअप वाहनचालकांना विचारणा केली असता, ही जनावरे मुकुटबन येथील सैयद खय्याम सैयद गफार याच्या मालकीची असून, कत्तलीसाठी आदिलाबाद येथे नेत असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी वाहनातील सर्व जनावरांची सुटका करून त्यांच्या चाऱ्यापाण्याच्या व्यवस्थेकरिता रासा येथील गुरु गणेश गोशाळेत सुपुर्द केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अवैधरीत्या जनावर वाहतूक करणारे आरोपी अक्षय अनिल करलुके (२८, रा. नेरड (पुरड), नितेश रवींद्र किनाके (२२, रा. वंदली, ता. वरोरा), नीलेश बंडू कोल्हे (२८, रा. लोणाराता, ता. समुद्रपूर) व सय्यद शाकीर सय्यद मेहमूद (३२, रा चिखलवर्धा, ता. घाटंजी) यांना अटक केली. तसेच जनावर वाहतूक करणारे बोलेरो पिकअप वाहनही जप्त केले.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबीचे पोलिस निरीक्षक आधार सिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमोल मुडे, पीएसआय रामेश्वर कांडुरे, पोलिस अंमलदार उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, नीलेश निमकर, सुधीर पिदूरकर, सतीश फुके यांनी केली.

Comments are closed.