राजूर बनले अवैध धंद्याचे आगार, मटका पट्टी बंद करण्याची तरुणांची मागणी

गावात राजरोसपणे मटका सुरू, एसडीपीओ व ठाणेदारांना निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर येथे राजरोसपणे सुरु असलेल्या मटका पट्टी विरोधात राजूर येथील तरुण सरसावले असून त्यांनी गावातील मटका पट्टी तसेच अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी केली आहे. याबाबत तरुणांनी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले.

राजूर येथे जोमात मटका पट्टी सुरू असून त्यामध्ये येथील नागरिक आपला पैसा उधळून आपला संसार उध्वस्त करीत आहे. मटक्याच्या माध्यमातून प्रचंड पैसा येईल ह्या भाबड्या आशेने अनेक स्त्रिया, पुरुष व अल्पवयीन सुद्धा आपला मेहनतीने कमावलेला पैसा मटका पट्टीत गमावत आहेत.

अनेक लोक आपला पगार, तर काही जण आपले साहित्य सुद्धा विकून ह्या मटका पट्टीत आपले नशीब चमकविण्याच्या भ्रमात पडले आहेत. परिणामी ह्या लोकांचे संसार उध्वस्त होत आहे. त्यामुळे ताबडतोब येथे सुरू असलेला मटका पट्टीचा अवैध व्यवसाय बंद करावा अशी मागणी राजूर येथील तरुणांनी केली आहे.

निवेदन देताना अकरम सिद्दीकी, मोसीम हुसेन, नावेद शेख, अशफाक अली, मो. असलम, मो. शकील, जलील, गुफरान खान, मो. आझाद, मो. तौसिफ, मो. अतिफ, मो. सलमान शाह, हसनन हुसेन आदींची उपस्थिती होती.

राजूर बनले अवैध धंद्याचे आगार
एकेकाळी उद्योगधंद्याचे गाव म्हणून ओळख असलेल्या राजूरची आता अवैध धंद्याचे गाव अशी ओळख पडत आहे. गावात मटका पट्टी सोबत अवैध दारू विक्री, गांजा विक्री सुरू आहे. या अगोदर मनसेच्या वतीने गांजा विक्रीची तक्रार करण्यात आली होती हे विशेष ! या तक्रारींकडे पोलीस विभाग काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा: 

पहाटे घडला थरार… चोरट्याचा पत्रकारावर हल्ला… अचानक समोर आल्याने रॉडने प्रहार

श्रीराम व जन्नत संघात रंगला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना… M ब्लास्टरचा धावांचा डोंगर

Comments are closed.