अखेर नाव गहाळ झालेले मजूर उत्तर प्रदेशकडे रवाना

नाव गहाळ झाल्याने परतण्यास आली होती अडचण

0

जब्बार चीनी, वणी: करोना संकटामुळे देशात व राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे राज्यांमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोहोचण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून परिसरातील 66 उत्तर प्रदेश मधील मजुरांना खाद्याचे पाकीट, सोशल डिस्टन्स व शासनाचे नियम पाळून आपल्या गावी जाण्यासाठी प्रवासाची व्यवस्था आज करण्यात आली. ही तीसरी खेप असून आतापर्यंत 878 मजूर त्यांच्या गावी रवाना झाले आहेत.

अनेक परप्रांतीय मजूरांची नावे यादीत नसल्याने अनेकांना धक्काच बसला होता. दहा बारा दिवसांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवुनही त्यांचे नावे गहाळ झाले होते. याबाबत ‘वणी बहुगुणी’ने माहिती घेतली असता कर्मचारी व अधिकारी एक दुस-यांवर चालढकल करीत असल्याचे लक्षात आले. शेवटी आमदार बोदकुरवारांनी प्रशासनाच्या वरीष्ठ अधिका-यांशी संपर्क साधुन सगळ्यांची जाण्याची व्यवस्था केली. तहसीलदार शाम धनमने स्वत: दोन तास उभे राहुन जिल्ह्यातील इतर ठिकाणी संपर्क करून ज्या ठिकाणचे मजूर रद्द झाले त्याएैवजी वणीचे 30 मजुर जादा पाठविले.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर अडकलेले होते. 90 मजुरांना चार दिवसापूर्वी बसेसने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले, तर उर्वरित 66 मजुरांना आज तीन बसेसव्दारे उत्तर प्रदेशकडे रवाना करण्यात आले. यावेळी मजुरांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. या सर्व मजुरांना घरी पाठविण्याची तयारी महसूल विभागामार्फत करण्यात आली होती. तालुक्यात परप्रांतीय मजूर अडकून पडले होते. प्रशासनाने ऑनलाईन नोंदणी करून तालुक्यातील वणी येथील 66 मजूरांना अमरावती व तेथुन रेल्वेने उत्तर प्रदेश येथे सोडण्यात येणार आहे.

यापूर्वीसुध्दा मध्यप्रदेशला 284 कामगार व झारखंडला 524 मजुरांना पाठविण्यात आले. आताची ही तीसरी खेप असून आतापर्यंत 878 मजूर रवाना झाले. याप्रसंगी तहसीलदार शाम धनमने, नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, दिनानाथ आत्राम, डेपो मँनेजर सुमित टीपले, मंडळ अधिकारी गुलाब कुमरे, समाधान पाटील, सागर आशीलवार, तिरानकर आणी पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.