राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वणीत जनजागृती रॅली

वणीतील विविध शाळा, महाविद्यालयांचा सहभाग

0

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये आज शुक्रवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे आयोजन तहसिल कार्यालय वणी यांच्या तर्फे करण्यात आले. या रॅलीमध्ये वणीतील सर्व शाळा व महाविद्यालय सहभागी झाले. सोबतच विविध सामाजिक संघटनेचे सदस्य आणि सर्वसामान्य वणीकर या रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅलीला जेसीआय या संघटनेचे सहकार्य लाभले.

सकाळी 9 वाजता ही वणीतील शासकीय मैदानावरून ही रॅली काढण्यात आली. खाती चौक, तुटी कमान, टागौर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अशी मार्गक्रमण करत या रॅलीचा समारोप शासकीय मैदानावर झाला. या रॅलीत वणीतील शाळा महाविद्यालयातील  सुमारे 500 विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व जेसीआयच्या सदस्यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर संदेश दिलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. बँडच्या गजरात जाणारी रॅली मतदारराजा जागा हो, मतदान करा, मतदार दिन चिरायु होवो, असे जनजागृतीपर नारे लावत रॅलीने मार्गक्रमण केले. रॅलीचा समारोप झाल्यानंतर वणीचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मतदान करण्याविषयी शपत देण्यात आली.

मतदार दिन म्हणजे लोकशाहीला बळकट करणारा दिवस: प्रकाश राऊत
राष्ट्रीय मतदार दिन म्हणजे लोकशाहीला बळकट करणारा दिवस. प्रत्येक व्यक्तीने आपला मतदान करण्याचा अधिकार हा वापरलाच पाहिजे. मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो! मतदानानिमित्त सुट्टी आहे, बाहेर फिरायचा प्लान करून हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होय. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे एका एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपला मतदानाचा हक्क बजावल्यानेच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी खारीचा वाटा उपयुक्त होतो. असे प्रतिपादन यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी केले.

यावेळी तहसिलदार शाम धनमाने यांनी ही उपस्थितांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. रॅली आणि कार्यक्रमाला जेसीआय वणीचे सहकार्य लाभले. यावेळी तहसिल कार्यालयाचे कर्मचा-यांसह जेसीआय वणीचे अध्यक्ष डॉ. अक्षय तुगनायत, प्रोजेक्ट डिरेक्टर जीतू पाटिल, जेसीआयचे सुमित चोरडीया, यांच्यासह शाहबुद्दीन अजानी, राहुल सुंकुरवार, जयेश चोरडीया, सौर्भ बरडिया, राहुल लाल, अभय मुथा, स्वप्निल भंडारी, नीलेश लोया, प्रकाश तिलवानी, सोनू नागदेव, जीतू साधवानी, गौरी लाल, शानू पाराशर, अविनाश पोतदार, आशिष काळे हे जेसी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन गजानन कासावार यांनी केले. तर आभार प्रदर्शन तहसिलदार शाम धनमाने यांनी केले.

२५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून 2011 सालापासून साजरा करण्यात येतो. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० या दिवशी झाल्याने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या घटनेची आठवण जागृत राहावी तसेच मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हा दिवस देशभरात साजरा करण्यात येतो.

लिंकवर क्लिक करून पाहा रॅलीचा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.