वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसह जैताई नवरात्रोत्सवची सुरुवात

भजन, कीर्तन, जगराता, विनोदी नाटक, व्याख्यान, सत्कार, नृत्यस्पर्धाचे आयोजन .... नवरात्र उत्सवासाठी मंदिराची आकर्षक सजावट

 

जितेंद्र कोठारी, वणी : येथील जागृत देवस्थान म्हणून प्रख्यात जैताई माता मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी नवरात्री उत्सव विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमासह संपन्न होणार आहे. भाविकांसाठी 15 ते 23 ऑक्टो. पर्यंत दररोज रात्री 8 ते 10 वाजे पर्यंत जैताई मंदिर प्रांगणात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन जैताई देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे. 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 15 ऑक्टो. रोजी वणीचे सुपुत्र शहीद ले.कर्नल वासुदेव दामोधर आवारी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त प्रा. रवींद्र साधू नागपूर यांचे कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी 16 तारखेला स्वर मिलाप संगीत संच यवतमाळचे अतुल तातावार देवी महिमा हा संगीत कार्यक्रम सादर करणार आहे. 17 ऑक्टो. रोजी विख्यात विदर्भ कन्याची ओळख करून देणारा व लोककलेचा दर्शन घडविणारा ‘विदर्भ कन्या’ हा संगीत नाटक ‘अभिव्यक्ती’ वैदर्भीय लेखिका संस्था द्वारे सादर केल्या जाईल.

राधाबाई बुधगावकर नाट्यसंच निर्मित आणि प्राचार्य हेमंत चौधरी दिग्दर्शित तुफान विनोदी नाटक ‘सदूचे लग्न’ चे आयोजन बुधवार 18 ऑक्टो. रोजी करण्यात आले आहे. नवरात्राच्या उत्तरार्धात दि. 19 ऑक्टो. रोजी दुपारी 1 वाजता आयोजित भव्य समारंभात अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना प्रतिष्ठित जैताई मातृगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शुक्रवार 20 ऑक्टो. रोजी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रा. रवींद्र शोभणेंचा जाहीर सत्कार आयोजित असून ते संत नामदेव या विषयावर आपले विचार मांडणार आहे. 

दिनांक 21 रोजी टीवीएस दुचाकीचे अधिकृत डीलर उत्तरवार मोटर्स यांच्या सौजन्याने ह.भ. प. मनु महाराज तुगनायत माताराणीका जगराता प्रस्तुत करणार आहे. रविवार 22 ऑक्टोबरला पारसमल चोरडिया फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल विजय चोरडिया यांच्या सौजन्याने भक्तीगीतांवर आधारित नृत्य स्पर्धाचे आयोजन व सोमवार 23 तारखेला भजन संध्या कार्यक्रमाने नवरात्रातील कार्यक्रमांची सांगता होणार आहे. नवरात्री दरम्यान दररोज सायंकाळी 6.30 वाजता सामूहिक आरती होणार आहे. नवरात्रोत्सवसाठी राहुल ठाकुर यांच्या सौजन्याने जैताई मंदिराची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.

जैताई अन्नछत्र समितीतर्फे दररोज महाप्रसाद

नवरात्री उत्सवाच्या कालावधीत भाविकांसाठी जैताई अन्नछत्र समितीतर्फे दररोज सकाळी 11 वाजता मंदिर प्रांगणात महाप्रसादची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दररोज सायंकाळी प्रसादचे वितरण केले जाईल. यासाठी जैताई अन्नछत्र समितीचे मुन्ना पोदार, नामदेव पारखी, मुलचंद जोशी, मयूर गोयनका, दिवाण फेरवाणी, आशिष गुप्ता, राजा जयस्वाल, विजय चोरडिया, अनुप राठी व इतर सदस्य भाविकांच्या सेवेत हजर राहणार आहेत.

Comments are closed.