आंदोलकांनी आश्वासनाचा साजरा केला वाढदिवस

मुंगोलीवासीयांनी केक कापून नोंदवला आगळावेगळा निषेध

0

रवि ढुमणे, वणी: वणी परिसरात कोळसा खाण प्रकल्पग्रस्त अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या गावांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता येताच वेकोलीच्या सतत चकरा मारणारे लोकप्रतिनिधी फिरकेनासे झाले आहे. 31 डिसेंम्बर 2015 पर्यत पुनर्वसन करण्याचे लेखी आश्वासन मात्र फोल ठरले आहे. त्यानिमित्त प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने या केंद्रीय मंत्र्यांच्या लेखी आश्वासनांचा पाचवा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम घेत एक आगळा वेगळा निषेध नोंदवला आहे. यानिमित्त प्रकल्पग्रस्तांनी केक कापून दिलेलं आश्वासन पाळावं अशी आशा व्यक्त केली.

19 नोव्हेंबर 2013 याच दिवशी विश्रामगृह घुग्गुस येथे वेकोली अधिकारी , लोकप्रतिनिधी आणि सद्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांनी खासदार या नात्याने मुंगोली गावाचे पुनर्वसन ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत करण्यात येईल असे लेखी स्वरूपात लिहून मुंगोली येथील ग्रामस्थांना पुनर्वसनाचे स्वप्न दाखवून आश्वस्त केले. मात्र २०१३ ते २०१५ पर्यंत पुनर्वसनासंदर्भात कुठलीही पाऊले उचलली गेली नाही. १५ सप्टेंबर २०१५ला पहिले आंदोलन करून पुनर्वसनाची खरी लढाई कोळसा खान प्रकल्प ग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून सुरु केली आणि ती लढाई सुरू आहे.

मुंगोली गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावून पुनर्वसना संदर्भात कार्यवाही सुरु आहे. नवीन रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला. शेती ऐवजी नोकरी याही विषयावर कोळसा खाण प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती लढत आहे. मात्र या सर्व आश्वासनांचा विसर खासदारांना पडला आहे. असे अनेक आश्वासन यापूर्वी त्यांनी दिले होते. मात्र कोणतीही पूर्तता केली नसल्याचा आरोप संघर्ष समिती ने केला आहे.

शुक्रवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत खासदारांनी केवळ आढावा घेतला मात्र परिसरातील समस्यांचे निराकरण झाले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एकूणच मुंगोली परिसरातील जनतेनी या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.