जनतेच्या हितासाठी माकप आणि किसानसभा मैदानात

भरपावसात वणी शहरात झालीत निदर्शने आणि आंदोलन

0

विवेक तोटेवार, वणी: केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात लावलेल्या लॉकडाऊनने सामान्यजनांची ससेहोलपट सुरूच आहे. त्यात मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर जनविरोधी धोरणे, कायदे राबवून सामान्य जनतेला संकटात टाकले आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला ढासळून देशातील जनतेवर उपासमारीची पाळी आली आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, छोटे व्यावसायिक हे पूर्णपणे देशोधडीला लागले आहेत. ही पार्श्वभूमी मांडत देशपातळीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने ९ ऑगस्ट क्रांतिदिनी व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून निदर्शने केलीत. आंदोलने केलीत. मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या निषेध करून जनविरोधी धोरणे रद्द करा किंवा खुर्च्या खाली करा हा नारा यावेळी देण्यात आला. वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भरपावसात ही निदर्शने झालीत. हे आंदोलन कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी व दिलीप परचाके यांचे नेतृत्वात करण्यात आले.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा, राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज ताबडतोब द्या, घरगुती व कृषिपंपाची वीज बिलं माफ करा, २०२०चे वीज विधेयक रद्द करा, युरियाची कृत्रिम टंचाई दूर करून शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्या आदी मागण्यांचा या आंदोलात अंतर्भाव होता. तसेच आदिवासी व इतर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यापासून कंपन्यांना रोखा व CAMPA कायद्याच्या नावाखाली बळजबरीने वनजमिनीवर झाडे लावणे बंद करा, प्रत्येक पिकाला उत्पादन खर्च अधिक ५०% नफा हमीभाव जाहीर करा व हमीभावा पेक्षा कमी दरात खरेदी करणार्यांवर गुन्हे दाखल करा हीदेखील निदर्शक आणि आंदोलकांची मागणी होती.

पेट्रोल, डिझेल व गॅस चे भाव निम्म्याने कमी करा, लाभार्थ्यांमध्ये वर्गवारी न करता प्रत्येक कुटूंबाला दरमहा 20 किलो धान्य, १ लीटर तेल, १ किलो डाळ, १ किलो साखर देण्यात यावी, केंद्र सरकारच्या मोफत धान्य वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा, महसूल, देवस्थान व वनविभागाच्या जमीन वरील अतिक्रमण धारकांना जमीनी वरून हटविणे व त्रास देणो बंद करा याही मागण्या यावेळी झाल्यात.

लॉकडाउन काळात प्रत्येक कुटुंबाला दरमहा ७५०० ₹ आर्थिक मदत द्या, आदिवासी जनतेला मिळणारी खावटी ताबडतोब द्या, केंद्र सरकारने घेतलेले नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा व ऑनलाइन शिक्षण पद्धती रद्द करा आदी मागण्या ह्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या वेळेस वणी पोलीस विभागाचे पी एस आय फटींग साहेब यांना मागण्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले.

ह्या आंदोलनात ग्रामीण कार्यकर्त्यांनी पाऊस सुरू असतानाही सहभागी होऊन आंदोलनाला यशस्वी केले.कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी,दिलीप परचाके, विप्लव तेलतुंबडे, कवडू चांदेकर, गजानन ताकसांडे, संजय कोडापे, अशोक येल्लावार, अशोक गेडाम,मनोज काळे,ऋषि कुलमेथे, शंकर भगत आदीं प्रामुख्याने हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.