घराजवळ सांडपाणी साचल्याने जनतेला रोगराईचा धोका

सांडपाण्यामुळे वाढली सर्वत्र दुर्गंधी

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कमळवेल्ली येथील गणेश सुधाकर नुगुरवार याच्या घराच्या बाजूला गावात पाणीपुरवठा करण्याकरिता वॉल्व बसवला आहे. हा वॉल्व अनेक दिवसांपासून लिकेज असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असते. ते पाणी नुगुरवार यांच्या घराजवळ येऊन साचत आहे. तसेच ग्रामपंचायतीचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे आजूबाजूच्या घरांचे सांडपाणी येऊन साचत असल्यामुळे दुर्गंधी वाढली आहे.

नुगुरवार कुटुंबासह इतर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. साचलेल्या पाण्यात अनेकदा विषारी साप, विंचूसुद्धा आढळून आलेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरणसुद्धा पसरले आहे. या बाबत ग्रामपंचायतीला अनेकदा लेखी आणि तोंडी तक्रार देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने नुगुरवार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे २५ जून रोजी तक्रार केली. त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी तक्रारींचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. परंतु अजूनपर्यंत आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. गावपातळीवर ग्रामपंचायत व तालुका पातळलीवर पंचायत समिती मदत करत नसतील, तर आम्ही कुठे जायचे असा प्रश्न तक्रारकर्त्याने उपस्थित केला आहे.

वॉर्डात साचलेल्या पाण्यामुळे जनतेला कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास, याला जवाबदार ग्रामपंचायत व पंचायत समिती राहील असा इशारा नुगुरवार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दुसऱ्यांदा तक्रारीतून दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.