सूर्यकुलातील परंपरेने माणूस घडविला – प्रा. डॉ. सिध्दार्थ बुटले

प्रा. विजय वाघमारे यांच्या सूर्यकुलातील वैचारिकता ग्रंथाचे प्रकाशन

निकेश जिलठे, वणी: भारतात आर्य परंपरा व सूर्यकुलातील परंपरा आहे. पण आर्य परंपरेने माणूस विकृत केला. काल्पनिक देवाचं भूत घालून लोकांना धार्मिक दलदलीत अडकून ठेवले. सूर्यकुलातील परंपरेने माणूस घडविला, असे प्रतिपादन आंबेडकरवादी विचारवंत प्रा. डॉ. सिध्दार्थ बुटले यांनी केले. प्रा. विजय वाघमारे यांचा सूर्यकुलातील वाचारिकता या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवारी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी वणी येथील वसंत जिनिंगच्या सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

लोकमान्य टिळक महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक विजय वाघमारे यांचे कोरना काळात निधन झाले होते. ते विविध विषयावर सातत्याने लिखान करीत. या लेखांचे संपादन करून सूर्यकुलातील वैचारिकता हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. प्रा. डॉ. ज्योतिक ढाले यांनी हा ग्रंथ संपादीत केला असून युगसाक्षी प्रकाशन, नागपूरद्वारा हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. ग्रंथाचे प्रकाशन प्रा. सुमंत देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिथी म्हणून प्रा. पुरुषोत्तम पाटील होते. प्रा. ज्योतिक ढाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी माधुरी विजय वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

डॉ. बुटले म्हणाले की प्रा. विजय वाघमारे यांनी आंबेडकरी विचारांचे सूत्र पकडून सूर्यकुलातील वैचारिकता या ग्रंथाच्या लेखांचे लेखन केले. हे सर्व लेख चिंतनशील असेच आहेत. हा ग्रंथ अभ्यासकांनी, संशोधकांनी अवश्य वाचावा. प्रा. सुमंत देशपांडे म्हणाले की प्रा. विजय वाघमारे यांच्या अभ्यासपूर्ण वाचनातून त्यांनी अनेक विषयांवर लेख लिहिले.ते सर्वंच लेख सूर्यकुलातील आहे.

सूर्यकुलातील वैचारिकता या ग्रंथावर भाष्य करताना प्रा.पुरुषोत्तम पाटील यांनी भारतीय समाज व्यवस्थेला ठिकठाक करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जातिअंताचा लढा दिला. हा लढा आजही देण्याची गरज कशी आहे हे प्रा.विजय वाघमारे यांनी सांगितले. त्यांचे विविध विषयांवरील लेख त्यांच्या समाज चिंतनातून साकार झाले.

विद्यार्थी प्रिय शिक्षक व एक साहित्यिक
प्रा. विजय वाघमारे यांचा 5 जानेवारी 1964 रोजी तालुक्यातील पुरड (नेरड) येथे जन्म झाला. त्यांनी लोकमान्य टिळक महाविद्यालयातून बीए तर नागपूर विद्यापिठातून एमए केले. 1990 साली ते वणीतील लोटी महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरते होते. काही काळ त्यांनी प्राचार्य म्हणूनही पदभार पाहिला. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना विविध पुरस्कार देखील मिळाले होते. कोरोनाच्या दुस-या लाटेत 22 एप्रिल 2021 रोजी त्यांचे निधन झाले. ते आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक होते. आंबेडकरी साहित्य, आंबेरकरी चळवळ, जलसाक्षरता, बुद्धिस्ट तत्वज्ञान, मराठी साहित्य अशा विविध विषयावरील त्यांचे लेख व कविता अनेक मासिकात प्रकाशित झाल्या आहेत. हे लेख व कविता संपादीत करून सूर्यकुलातील परंपरा हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. हा ग्रंथ 9763690377 (राजेश वाघमारे) या क्रमांकावर संपर्क साधून इच्छुकांना खरेदी करता येणार आहे. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुलदीप शेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजेश वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमात माजी प्राचार्य अनिल हुड, संदीप वाघमारे, वर्षा ढाले, अनघा वाघमारे, प्रियंका वाघमारे आणि आप्तेष्ट व श्रोत्यांची उपस्थिती होती. 

Comments are closed.