स्वातंत्र्याच्या 74 वर्षा नंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही

दगड धोंड्यातून काढावी लागते वाट, सर्वसामान्यांसह रुग्णांना त्रास

सुरेश पाचभाई, बोटोणी: सध्या संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) यथे अजूनही जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा सर्वसामान्यांना तर त्रास होत आहे. मात्र सर्वाधिक त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. एकदा तर गर्भवती महिलेला मारेगाव येथे दवाखान्यात नेताना बैलगाडीतच प्रसुती झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

मारेगाव तालुक्यातील हटवांजरी (पोड) ही एक आदिवासी समाजातील लोकांची वस्ती आहे. सुमारे 25 कुटुंब या पोडामध्ये राहतात. हटवांजरी या गावापासून पूर्वेस 2 की. मी अंतरावर हे हटवांजरी हे पोड आहे. पोडा पासुन उत्तरेस 2.5 की. मी अंतरावर वणी- यवतमाळ राज्य महामार्ग आहे. या मार्गावरून पोडातील रहिवाशी मारेगावात येतात. मात्र या पोडा वरून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अजूनही रस्ता बनलेला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहे.

मारेगाव येथे आठवडी बाजारासाठी लोकांना नेहमी येणे जाणे सुरु असते तसेच शिक्षणासाठी, कामासाठी येथील नागरिकांना 2.5 कीलोमीटरचा प्रवास कच्च्या रस्त्याद्वारे करावा लागतो. पावसाळ्यात तर चिखल तुडवत जावे लागते व याच काळात साप, विंचू इत्यादींचा सामना करावा लागतो. गाडी जात नसल्याने आजारी लोकांना चांगल्याच हाल अपेष्टा सहन करत मारेगाव तेथे पोहचावे लागते.

हटवांजरी (पोड) हे शंभर टक्के आदिवासी वस्त्ती आहे. या वस्तीकडे लोकप्रतिनिधीसह, प्रशासनानेही कायम पाठ फिरवली आहे. केवळ मत मागण्याच्या वेळी नेते इथे येतात आणि कोरडी आश्वासने देवून जातात त्या नंतर त्या पोडाकडे कोणी फिरकत देखील नाही अशी आपबिती गावकरी बोलून दाखवतात.

पावसाळ्यात असे चिखल तुडवत काढावी लागते वाट

एका महिलेची बैलगाडीतच प्रसुती
काही महिन्याआधी एक महीला गर्भवती असल्याने प्रसूतीसाठी गावी माहेरी हटवांजरी येथे आली होती. प्रसूतीकळा आल्यावर तिला हटवांजरी पोड येथून मारेगाव येथे बैलगाडीत टाकून नेले जात होते. मात्र पक्का नसल्याने विलंब झाला व त्या महिलेची बैलगाडीतच प्रसुती झाली होती. तर तिन महिन्याआधी प्रसुतीसाठी मारेगाव येथे जाणारी एका महिलेला वेदणेने विव्हळत असल्याचे पाहून तिला दुचाकी चालक तरुणांनी मारेगाव येथे नेले होते.

सदर रस्ता मंजूर असल्याचे गावकरी सांगत आहे. मात्र अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. याबाबत गावक-यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. जर लवकरात लवकर रस्ता तयार झाला नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा गावातील रहिवाशी संदीप देवाजी आत्राम, बापूजी कुमरे, राजु बापूराव मेश्राम, दिपक नानाजी आत्राम, रमेश हनगु कुमरे ,दादाजी वाघु आत्राम ,रामू रमेश कुमेरे, प्रमोद रामाजी मेश्राम, पांडुरंग टेकाम, रामाजी बापुराव मेश्राम, पांडुरंग गंगाराम आत्राम, हरबा आत्राम सुरेश हरबा आत्राम ,पोतू भुरबा आत्राम यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे.

Comments are closed.