वणी गोळीबारातील हुतात्म्यांना माकपची श्रद्धांजली

1974 साली महागाईच्या विरोधात झाले तीव्र आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक टिळक चौकात सन 1974 साली 2 जानेवारीला महागाईच्या विरोधात प्रचंड मोठे आंदोलन झाले होते. तेव्हा पोलिसांकडून गोळीबारदेखील झाला होता. त्यात 7 जणांचा बळी गेला होता. अनेक वणीकरांना ही घटनाही माहीत नाही. किंबहुना चौकातील स्मारकाचंही अनेकाना भान नसते. तो दिवस वणीच्या इतिहासातील अविस्मरणीय दिवस ठरला. ह्या दिवसाला दरवर्षी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो. याही वर्षीसुद्धा माकपचे कॉ. शंकरराव दानव, माकपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी टिळक चौकातील स्मारकाला अभिवादन केले.

आज महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. गरिबांना आणि सर्वसामान्यांना ह्या महागाईमुळे आपल्या जीवनावश्यक गरजाही पूर्ण करणे कठीण झाले आहे. तशीच महागाई 1974 सालीसुद्धा प्रचंड वाढली होती. जनता महागाईमुळे होरपळत होती. त्यावेळेस वणी येथे महागाई कृती समिती स्थापन करण्यात आली. 1974 सालाच्या नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले.

मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. ह्यामुळे जनता भडकली होती. आंदोलनकर्त्यांकडून वाढता प्रचंड रोष व जोश बघून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तितरबीतर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही परिस्थिती आटोक्यात न आल्याने शेवटी पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. ज्यामध्ये 7 जणांच्या बळी गेला. ही घटना वणीचा इतिहासातील अविस्मरणीय असून मन हेलावून सोडणारी होती. ह्या घटनेला आज 49 वर्षे झाली आहेत.

ह्या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी एक कॉ. शंकरराव दानव हे आजही ह्या घटनेने हादरतात. वणीतील टिळक चौक हा गोळीबार चौक म्हणूनही परिचित आहेत. ह्याच चौकात गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलनातील हुतात्म्यांचे स्मारक बसविलेले आहे. ह्या हुतात्म्यांना आज 2 जानेवारीला माकपचे शंकरराव दानव, विनायक सोनुले, राधेश्यामजी, अनिल ठाकरे, पुंड बाबू, विष्णू दानव, सुनिता शिरसाट व इतरांनी मेणबत्ती प्रज्वलित केली. पुष्प वाहून उपस्थितांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.

पुढील वर्षी ह्या घटनेला 50 वर्षे होतील. त्यानिमित्त मोठा कार्यक्रम घेण्याचा मानस आहे. जेणेकरून जनतेला ह्या घटनेची माहिती देता येईल. महागाईचा उद्रेक आणि त्याचे दुष्परिणाम यावरही प्रबोधन करण्यात येईल. अशी माहिती कॉ. शंकरराव दानव यांनी दिली.

 

Comments are closed.