छोट्या कंत्राटदारांच्या जीवावर उठले नगरपरिषद मुख्याधिकारी ?

जितेंद्र कोठारी, वणी : मागील एका वर्षांपासून प्रशासक राज असलेली वणी नगर परिषदचे कारभार मनमानी पद्धतीने होत असल्याचा आरोप होत आहे. लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने शहरात अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरणचे काम सुरु आहे. नुकतेच काही रस्त्यांसाठी ऑनलाईन निविदा काढण्यात आली आहे. परंतु 20 ते 30 लाखाच्या या कामासाठी निविदेमध्ये काही जाचक अटी टाकण्यात आली आहे. ज्यामुळे लहान कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व सहकारी संस्थांना निविदेत भाग घेता येणार नाही. 

नगर परिषद क्षेत्र अंतर्गत वणी शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील ऍड. लोडे ते वरद अपार्टमेंट पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम (अंदाज पत्रकीय किंमत 2056585/-), प्रभाग क्रमांक 1 मध्ये जैताई मंदिर ते तुपकर यांचे घरापर्यंत सिमेंट रोड बांधकाम ( अंदाज पत्रकीय किंमत 3995288/-) तसेच प्रभाग क्रमांक 1 मधील राळे ते खंडाळकर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम ( अंदाज पत्रकीय किंमत 2375120-) या कामासाठी 28 एप्रिल 2023 रोजी निविदा सूचना प्रकाशित करण्यात आली. तसेच 29 एप्रिल 2023 पासून महाराष्ट्र शासनाच्या संकेस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली.

सदर कामासाठी निविदा भरण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 असून कंत्राटदाराकडे स्वतच्या मालकीचा रेडीमिक्स काँक्रिट प्लांट (स्काडासह) असल्याची जाचक अट निविदेत जोडण्यात आली आहे. वास्तविक पाहता 20 ते 30 लाख पर्यंतचे सिमेंट रोडचे बांधकाम मिक्सर मशीन किंवा अजॉक्स यंत्राच्या साहाय्याने करणे अपेक्षित आहे. आर एम सी प्लांट आवश्यक असल्यास स्वतचा किंवा भाडेतत्त्वावर (Own/Hire) ची कंडीशन देण्यात येते. 

मात्र या कामात गरज नसताना काही मोठे कंत्राटदार व राजकीय दबावाखाली मुख्याधिकारी न. प. वणी यांनी रेडीमिक्स काँक्रिट प्लांटची अट निविदेत टाकल्याचे आरोप होत आहे. वणी उपविभागात ठराविक कंत्राटदाराकडे स्वतच्या मालकीचे आर एम सी प्लांट आहे. असे कंत्राटदार प्रतिस्पर्धा न करता आपल्या नावावर निविदा सोडवून मग लहान ठेकेदारांना टक्केवारीवर काम देतात. आणि ते ठेकेदार मिक्सर मशीन किंवा अजॉक्सच्या मदतीनेच काम करतात. 

नगर पालिकेत प्रशासक राज की मुख्याधिकारी राज ? 

जानेवारी 2022 पासून वणी नगर पालिकेवर प्रशासक राज आहे. प्रशासक म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. परंतु मागील एका वर्षात नगर परिषदेने केलेल्या कामात प्रशासक यांची भूमिका कुठंही नागरिकांना जाणवली नाही. यात अतिक्रमण विरोधी कारवाई , शुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रश्न, न. प. कर्मचाऱ्यांवर कारवाई असो की शहरात रस्त्यांचे बांधकाम. या सर्व कामात मुख्याधिकारी यांच्या मर्जीने काम होत असल्याची खमंग चर्चा शहरात सुरू आहे.

Comments are closed.