सुशील ओझा, झरी:वीज ग्राहकांच्या समस्या निकाली काढण्यासोबतच वीज वितरण कंपनीबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याकरिता झरी येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी ११ ते ४ या वेळेत झरी उपविभाग कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात 26 ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या.
तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वीज वितरण कंपनीबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळतात. विद्युत बिल कमी जास्त येणे, मीटर जोराने फिरणे, वीज बिल न मिळणे, मीटर रीडिंग न घेणे, ॲवरेज बिल पाठविणे, मीटर फॉल्टी असणे, लाईन न राहणे या व्यतिरिक्त अनेक तक्रारी असतात. सर्व तक्रारींचे निराकरण एकाच दिवसात होऊ शकत नसल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जनतेचा मोठा रोष असतो.
बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...
अधिकारी व कर्मचारी कमी आणि जास्त गावे असल्यामुळे सर्व तक्रारी निकाली काढणे कठीण जाते. वीज वितरण कंपनीविषयी जनतेने गैरसमज करून घेऊ, नये तसेच आपली कोणतीही समस्या असो ती सोडविण्याकरिता कंपनी कटिबद्ध आहे तसेच तालुक्यातील गोरगरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या तक्रारी निकाली काढण्याच्या उद्देशाने ग्राहक तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, अशी प्रतिक्रिया यावेळी उपकार्यकारी अभियंता राहुल पावडे यांनी दिली.
सर्व विद्युत ग्राहकांनी लेखी तक्रार घेऊन ११ ते ४ वाजेपयंर्त झरी उपविभाग कार्यालयात हजर रहावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीतर्फे उपकार्यकारी अभियंता राहुल पावडे यांनी केले होते. या मेळाव्यात आलेल्या तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा केला जाईल अशी माहिती अभियंता राहुल पावडे यांनी दिली.