बहुगुणी डेस्क, वणी: दारूचे पार्सल घेतल्यानंतर बारसमोर झालेल्या किरकोळ वादातून एका युवकावर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी दिनांक 3 मार्च रोजी एपीएमसी मार्केट समोरील कृषी केंद्राच्या गोडावून जवळ ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणा-या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, फिर्यादी हा गाडगेबाबा चौक येथील रहिवासी आहे. 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4:30 वाजताच्या सुमारास तो त्याच्या दोन मित्रासमोर कृषी केंद्राच्या गोडाऊनजवळ बसून गप्पा करीत होता. त्यानंतर ते तिघेही आशा बार, वणी येथे दारू खरेदी करण्यासाठी गेले. त्यांनी बारच्या आत येण्याबाबत मॅनेजरला विचारणा केली. मात्र मॅनेजरने बाहेरच थांबवले व त्यांना दारूचे पार्सल दिले.
बारसमोरून निघताना तिथे आरोपी अंशु तांबे (वय 28, रा. वणी) व त्याचा एक मित्र तेथे आला. ते फिर्यादी व त्याच्या मित्रांच्या गप्पागोष्टीत हस्तक्षेप करू लागले. यावर फिर्यादीने तुम्ही मधे बोलू नका असे सांगितले आणि ते कृषी केंद्राजवळील गोडाऊन जवळ निघून गेले. तिथे बसून ते पुन्हा गप्पा गोष्टी करीत असताना काही वेळाने अंशु तांबे व त्याचे दोन मित्र तिथे आले. यावेळी अंशु तांबे याने “तू बारमध्ये मला का बोललास?” असे म्हणत वाद घालत फिर्यादीवर हल्ला केला.
अंशु तांबे याने जवळ असलेल्या प्लास्टिकच्या खुर्चीने फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण केली, यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून जखम झाली आणि रक्तस्राव सुरू झाला. याच वेळी अंशु तांबे याच्यासोबत असलेल्या त्याच्या एका मित्राने मोटारसायकलवर दगड फेकून मारत तोडफोड केली. त्यानंतर तिघेही आरोपी तेथून निघून गेले.
घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादीने आपल्या मित्रांसह थेट वणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अंशु तांबे व त्याच्य साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



Comments are closed.