खासगी कंपन्यांकडून कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष.

कामगारांचा अपघात विमा काढला नसल्याचा आरोप .

0

सुशील ओझा, झरी: नियमाने आठ तासांच्यावर कंपनीत काम करून घेणे म्हणजे शासनाच्या नियमाचे उल्लंघन आहे. परंतु काही कंपन्यांमध्ये अत्यल्प पगारावर १२ तास काम करून घेत आहेत. नियमाने प्रत्येक कामगारांचा अपघात विमा काढणे आवश्यक आहे. तरीही बहुतांश कामगारांचा विमा काढलेला नाही, असा आरोप होत आहे.

तालुक्यात कोळसा खाण, डोलामाईट, चुना फॅक्टरी व इतर कंपन्या आहेत. या फॅक्टरींमध्ये तालुक्यासह बाहेर गावातील शेकडो तरुण काम करीत आहे. तालुक्यातील कंपनीमध्ये शासकीय नियम डावलून कामगारांचा वापर करून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आठ तासांच्यावर काम केल्यास ओटी म्हणून जास्त पैसा दिला जातो. परंतु वरील काही कंपन्यांमध्ये १२ तासांच्या दोन शिप्ट चालते. त्यात कामगारांकडून १२ तास काम करून घेत आहे. कंपनी कामगार मजुरांना २८० रुपये रोजीप्रमाणे कमी पेमेंट देऊन १२ तास काम करून घेत आहे. नियमाने प्रत्येक कामगारांचा अपघात विमा काढणे आवश्यक आहे. बहुतांश कामगारांचे अपघात विमाच काढला नसल्याची माहिती आहे. .

कारखान्यात कोळसा, गोटा, पोते, लोखंड व इतर कारखान्यात लागणारे इतर वस्तू उचलणे, ठेवणे ही कामे कामगारांना करावी लागतात. त्याकरिता कंपनीकडून कामगारांना हेल्मेट, चष्मा, जोडे, हॅन्डग्लोज व इतर संरक्षण किट देणे आवश्यक आहे. बहुतांश कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व प्रकारामुळे कंपनीत एखादा मोठा अपघात किंवा घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न कामगारांकडून उपस्थित होत आहे.

काही कारखान्यात टायरची काळी भुकटी वापरली जात आहे. यामुळे प्रदूषणातही वाढ झाली असून या धुळीचा परिणाम शेतकऱ्यांच्या पिकावर होत आहे. तीन वर्षांपासून मुकुटबन येथील विनोद जंगीलवार नामक युवकाचा चुना कंपनीत काम करीत असताना डोळा निकामी झाला होता. नंतर कंपनीला जाग आली. जंगीलवार याच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून देण्यात आले. आज त्याची दृष्टी परत आली. मुजोर कंपन्यांना वठणीवर आणण्याकरिता प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.