विवेकानंद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा भावनांनी भरलेला स्नेहमिलन सोहळा
शाळेच्या प्रांगणात पुन्हा हास्य, गप्पा आणि स्नेहाचा वर्षाव
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वर्ग 10वी (क) बॅच 2003-04 च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या अंगणात आठवणींचा स्नेहसोहळा साजरा केला. रविवार, 26 ऑक्टोबर रोजी आयोजित या स्नेहसंमेलनाने जुन्या दिवसांना नव्या उत्साहाने उजाळा दिला. शाळेच्या भिंती, वर्गखोल्या, आणि अंगण पुन्हा एकदा हास्य-विनोद, गप्पा आणि भावनांनी भरून गेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रेम राठोड सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. खोंडे सर उपस्थित होते. या दोन्ही शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांच्या एकतेचे आणि समाजातील योगदानाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या आठवणी शेअर करत, त्या काळातील गमतीजमती पुन्हा जिवंत केल्या.
या स्नेहसोहळ्याची खासियत म्हणजे, आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी—कोणी देशात, कोणी परदेशात—आपली व्यस्त दिनचर्या बाजूला ठेवून आवर्जून उपस्थित राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींचा ओलावा स्पष्ट दिसत होता.
सागर आत्राम, स्वप्निल पोतले, अविनाश सहारे, सादिक शेख, अक्षय केळोदे, श्याम अघळते, विजय गुरुनुले, मृणाल ठाकरे, जफर अली सय्यद, तुषार रुईकर, निलेश चौधरी, उज्वला खामनकर, प्रियंका पारधी, सीमा कावळे, मंजुषा मिलमीले, खुशबू जुनेजा, सपना एडलावार, भारती कुचणकर, पूनम गोहोकार, प्राजक्ता देठे, अमृता पचारे, स्मिता पाटील, अनिता नागपुरे, ओमेश्वरी ढोकणे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्याचे आयोजन, नियोजन आणि सजावट यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि पुढील काळातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. या स्नेहसंमेलनामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा पूल बांधला गेला असून, विद्यालयाशी पुन्हा नाते दृढ करण्याची संधी मिळाली.
शाळेच्या अंगणात पुन्हा एकदा आठवणींचा गंध दरवळला… आणि प्रत्येकाच्या मनात एकच भावना उमटली—”शाळा म्हणजे फक्त शिक्षण नव्हे, ती एक भावना आहे… जी काळाच्या ओघातही ताजीच राहते.



Comments are closed.