कामगारांचा जीव वाचवा: विविध संघटनांची मागणी

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तीमध्ये संताप...

0

जब्बार चीनी, वणी: औरंगाबादजवळील भीषण रेल्वे दुर्घटनेत 16 मजुरांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली.  किमान यापुढे तरी कोणीही पायी गावी जाणार नाही याची सरकारने दक्षता घ्यावी. ज्याठिकाणी कामगार अडकले आहेत तेथून त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी वणीतील विविध संघटनांकडून होत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून रोजगारासाठी आलेले विविध राज्यांतील नागरिक मजूर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडले. हाताला काम नाही. जवळ पैसा नाही. त्यातच दिवसामागून दिवस लोटूनही गावी जाण्याची सुविधा होत नसल्याने अनेक जण आपल्या गावी पायी चालत निघत आहेत.

रस्त्यात पोलीस त्रास देतात म्हणून ते रेल्वे रुळावरून रस्त्याने चालत आपल्या गावाच्या दिशेने कूच करीत आहेत. रात्री एखाद्या आडोशाला किंवा झाडाखाली झोपतात. गेल्या काही दिवसांपासून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. ही सुविधाही मोजक्या ठिकाणी आहे. त्यामुळेच अडकलेल्या लोकांना पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यातूनच औरंगाबादेतील सटाणाच्या अपघातानंतर तरी यापुढे कोणावर पायी चालण्याची वेळ येणार नाही याची काळजी सरकारने घेण्याची गरज असल्याचे मत सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून वर्तवले जात आहे.

पायी जाणा-यांकउे दुर्लक्ष का करण्यात येत आहे. आता तरी कामगार ज्या ठिकाणी आहेत थेट तेथूनच गावी जाण्यासाठी त्यांच्यासाठी वाहतुकीचे नियोजन केले पाहिजे. आता याकडे दुर्लक्ष झाले, तर यापुढेही अशा घटना घडण्याचे नाकारता येणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया वणीतही उमटत आहेत. जाणून घेऊया याबाबत वणीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे काय म्हणणे आहे.

सरकारचे मजुरांकडे दुर्लक्ष – प्रवीण खनझोडे
सध्या सर्वात जास्त मजूर भरडला जातोय. सरकारचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. कामगारांचे पगार रोखले जाणार नाहीत, असे सांगण्यात आले. मात्र कोट्यावधी रूपये कमावणा-या कंपन्यांनी कामगारांकउे दुर्लक्ष केले. कामगारांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. किमान यापुढे कोणीही पायी जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी.

संयम संपल्याने पायीच प्रवासाचा निर्णय़ – रवी बेलुरकर
वारंवार मागणी करूनही वेळीच रेल्वे सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अखेर कामगारांचा संयम संपल्याने ते पायीच गावी निघाले. किमान यापुढे कामगारांवर पायी जाण्याची वेळ येणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. त्याच्यासाठी पुरेशा रेल्वे, बस सोडाव्यात.

अडकलेल्या ठिकाणाहून सुविधा करा – राकेश खुराना
कामगार जेथे अडकलेले आहेत थेट तेथून त्यांची पायी जावे लागणार नाही. ही खबरदारी घेतली पाहिजे. रेल्वे रूळावर अपघात झाला. आता रस्त्यावर अपघात होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. कारण अनेक जण रस्त्याने पायी जात आहेत.

‘भारता’पेक्षा ‘इंडिया’कडे सरकारचे अधिक लक्ष – कॉ. दिलिप परचाके
विदेशा मध्ये अडकलेल्या भारतीयांना विमानाने आणण्याच्या हालचाली जोरात सुरू होतात. कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ बस सेवा उपलब्ध करून त्यांना घरी आणल्या जाते. हा india च़ आहे …! india आणि भारत याचा मुख्य गाभा (base) विषमता, शोषण असाच आहे. कामगारांचे निधन होऊ नये बळी जावु नये या करिता उपाययोजना करण्या ऐवजी सरकार कडुन कामगारांच्या म्रूत्यूचे बक्षीस दिल्या जाते. अनेक कामगार आजही रस्त्यावरून, रेल्वे रुळावरून चालत जात आहे. या घटनेपासून सरकारने धडा घेवुन अश्या अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना घरी सोडण्यासंदर्भात त्वरीत पावले उचलावी, जेणेकरून आणखी कोणत्या कामगारांचा बळी जाणार नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.