आशा कर्मचाऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास आम्ही प्रयत्नरत

नवनियुक्त अध्यक्ष कविता कुबडे आणि सचिव मेघा बांडे यांचं आश्वासन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नाव ‘आशा’ मात्र प्रशासन आणि अन्य ठिकाणांहून पदरात केवळ निराशाच. यावर मात करीत आशा कर्मचाऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यास प्रयत्नरत असल्याचं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. वणी शहर आशा कर्मचारी संघटनेच्या नवनियुक्तनअध्यक्ष कविता कुबडे आणि सचिव मेघा बांडे यांनी हे आश्वासन दिलं. जनतेच्या आरोग्याचं महत्त्वपूर्ण माध्यम ठरलेल्या आशा कर्मचारी यांना मात्र आपल्या मानधन वाढविण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो. त्यातच विना वेतनावर कार्य करीत असताना त्यांना अनेकदा आरोग्य अधिकारी तसेच न.प. किंवा ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांचासुद्धा रोष ओढवून घ्यावा लागतो. अशा बिकट परिस्थितीत काम करीत असताना शासनाकडून त्यांना मूठभर मानधन दिले जाते.

त्यामुळे वारंवार संघर्ष करीत त्यांना मार्गक्रमण करावे लागते. हा संघर्ष करीत असताना त्यांना संघटनेची गरज असते. म्हणून देशपातळीवर त्यांच्या अधिकारासाठी संघर्ष करणारी सिटू कामगार संघटना यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत आहे. ह्या संघटनेचा जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे ह्या वणी येथे आशा कर्मचाऱ्यांचा समस्या जाणून घेण्यासाठी आल्या होत्या. त्यानिमित्ताने वणी येथे आशा कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीचा अध्यक्षस्थानी संघटनेचा तालुका अध्यक्ष कॉ. प्रीती करमनकर होत्या. माकपचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, जनवादी महिला संघटनेच्या कॉ. अनिता खुनकर व सरिता दानव ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या बैठकीत कॉ.उषा मुरके यांनी प्रत्येक आशा कर्मचारी यांची समस्या ऐकून घेतली. त्यावर त्यांनी त्यांना समस्या सोडविण्यासाठी संघटनेची एकता व मजबुती आवश्यक असल्याचे सांगितले. संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांनी सध्या आशा व गट प्रवर्तकांचे राज्यव्यापी संप पुकारल्याने शेवटी राज्यसरकारला आशा कर्मचाऱ्यांचा मानधानमध्ये 5 हजार रूपयांची वाढ करावी लागली. हा संघटनेच्या एकतेचा, मजबुतीचा व संघर्षाचा विजय असल्याचे सांगितले.

यावेळेस कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी सिटू कामगार संघटना ही देशातील कामगारांची सर्वात मोठी संघटना असल्याचं म्हटलं. कष्टकऱ्यांचा सर्वच विभागात कार्यरत असल्याने प्रत्येक कामगाराचा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी सक्रिय असल्याचे सांगितले. कॉ. अनीता खुनकर यांनी अनेक कामगार संघटनांचे उदाहरण यावेळी दिले. त्या म्हणाल्या की, अनेक संघटना ह्या दुकानदारी म्हणून चालवीत आहेत. त्यातील नेते हे कामगारांचा वापर करीत आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. या वेळेस सरिता दानव यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

यावेळेस वणी शहराची आशा कर्मचाऱ्यांची कार्यकारिणी तयार करण्यात आली. ह्यामध्ये अध्यक्षपदी कविता कुबडे, उपाध्यक्षपदी योगिता कूनघाटकर तर सचिवपदी मेघा बांडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने सोनाली निमसटकर, शीला नळे, अश्विनी पोहेकर, गीता भालेराव, वर्षा गोवरदिपे, वंदना ठाकरे, प्रतिभा लांजेवार, कल्पना मजगवळी,  शुभांगी नागपुरे, ताई डोंगरे, चंदा पथाडे, किरण बोंसुले, शुभांगी डोंगरे,  माधुरी कामडे आदी व अन्य आशा कर्मचारी उपस्थित होत्या.

Comments are closed.