इस शहर मे हर शक्स परेशानसा क्यू है?

कोरोना कहर, असहायतेचा कळस

0

जब्बार चीनी, वणी: ‘ सीने मे जलन आँखो मे तुफानसा क्यू है, इस शहर मे हर शक्स परेशानसा क्यू है’ शहरराय यांची ‘गमन’ या चित्रपटातील सुरेश वाडकरांनी गायलेल्या गझलेचा हा शेर आज वणीकर कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे प्रत्यक्षात अनुभवत आहे. कोरोनाच्या एका विषाणूने मानवी जीवनच धोक्यात आणले असून या आजाराने ‘अच्छे- अच्छे रुस्तम को खाक में मिला डाला’ अशी स्थिती निर्माण झाली आहे

हा कोरोनाचा हल्ला कसा रोखावा याच विवंचनेत सर्वजण आहेत. कोराना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही हा विषाणू आपला पिच्छा सोडत नसल्याने हतबलतेत वाढ झाली आहे इंग्रजीत एक म्हण आहे ‘हिस्ट्री रिपीटस् इट सेल्फ’ या म्हणीचा आपण तंतोतंत अनुभव लोक घेत आहेत. मागील वर्षीचा एप्रील, मे आणि या वर्षीचा एप्रिल, मेमध्ये तेच भयावह चित्र डोळ्यासमोर जण काही चित्रपटातील फ्लॅशबॅक शोभावा असेच म्हणावे लागेल.

कोरोनाच्या दुस-या लाटेने शहरात हाहाकार माजवला आहे. पहिल्या लाटेतही रुग्णसंख्या ही कधी एका दिवशी शंभरच्या वर गेली नव्हती. ती आता एकाच दिवशी 250 पेक्षा अधिक येत आहे. आगामी काळात काळजी आणि नियमांचे पालन न केल्यास रुग्णसंख्येचा उद्रेक होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या आजाराने ज्या प्रमाणे सरकारी आणि खासगी वैदयकीय यंत्रणा त्रस्त आहे त्याच प्रमाणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीदेखील हतबल आणि हताश झाला आहे.

ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहेत ते देखील आणि ज्यांच्याकडे खाण्याची भ्रांत आहे ते देखील या कोरोनाच्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी डॉक्टर सांगतील ते उपाय निमूटपणे करत आहेत. इतकेच काय तर उपाय नसल्याने व्हॉट्स ऍपवर आलेले मॅसेज वाचून देखील अनेक लोक घरगुती उपाय करून रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. इतकी हतबलता या आधी कधीच दिसून आलेली नाही असे शहरातील जुणे जाणते लोक सांगत आहेत.

अनेकांना वेगवेगळे आजार असताना जर कोरोनाचा शिरकाव शरीरात झाला तर मग ते आणखी जिकिरीचे ठरत आहे. आज वणीत शासकीय आणि खासगी रुग्णालयाच्या इमारती रुग्णांनी व्यापल्या आहेत. कोरोनामुळे रुग्णालयात गेल्यावर आई- मूलगा, तसेच घरातील सर्वाची ताटातूट होत आहे. इच्छा असूनही रुग्णांची भेट होत नसल्याने मनाची चलबिचल वाढली असून , भावनिक आणि मानसिक खच्चीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे.

आज मी-मी म्हणणा-यांना देखील कोरोनासमोर लोटगंण घातले आहे. या आजाराने पैसा गौण ठरविला असून लोकांना संकटांशी लढण्याची तयारीच स्वत:लाच करावी लागत आहे. यावर डॉक्टरांकडून औषधांचा मारा सुरुच आहे .

मध्यंतरी कोणीच कोणाची किंमत ठेवत नव्हते. ते आता स्वत: ची श्रीमंती, पदामुळे मिळालेली प्रतिष्ठा बाजूला ठेवून किमान एकमेकांशी संवाद साधत आहेत. कोरोनाने अहंकाराची पाळेमुळे उखडून फेकली आहे. कुटुंब आणि समाजाची साथच कुठल्याही काळात सोबत असल्यासच आपण संकटाशी दोन हात करून ते परतविण्याची हिंमत ठेवतो. एकुणच वैदयकीय आणि विज्ञानाने प्रगती केली असली तरी तिच्या मर्यादा कोरोनाने अधोरेखित केल्या आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरू नये .

जाये तो जाये कहॉ…?
रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारीसह खासगी दवाखानेही फुल्ल झाले आहेत. त्यामुळे कोरोना रूग्ण आणि नातेवाईकासमोर उपचारासाठी जावे तरी कुठे , असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच हे एक व्यवस्थेसमोरचे आव्हान म्हणावे लागेल.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.