कोरोनाचा आता ग्रामीण भागात शिरकाव

'या' गावात आढळून आला कोरोनाचा नवीन रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: वणी शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता कोरोनाने आपले पाय ग्रामीण भागातही पसरवण्यास सुरूवात केली आहे. वणी जवळील राजूर (कॉलरी) या गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावासह वणीतही खळबळ उडाली आहे. नवीन आढळलेली रुग्ण 35 वर्षीय महिला असून ती नागपूरला उपचारासाठी गेली असता तिथे तिला कोरोना असल्याचे निष्पन्न झाले आहे. नवीन रुग्ण आढळताच प्रशासन पुढील कार्यवाहीच्या तयारीला लागले असून त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्याच्या व कॉरन्टाईन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. ही रुग्ण आधीच्याच साखळीतील आहे? की ही साखळी नवीन आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

राजूर (कॉलरी) येथील वार्ड क्रमांक 2 मध्ये राहणा-या महिलेवर हृद्यरोगासंबंधी वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे जाण्याच सल्ला दिला होता. त्यामुळे ती महिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे गेली होती. बाहेरून रुग्ण आल्यावर नागपूरमध्ये आधी कोरोनाची चाचणी घेतली जाते. त्यामुळे तिथे डॉक्टरांनी त्या महिलेची कोरोनाची चाचणी घेतली. त्यात ती महिला पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले. महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव्ह येताच याची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने तातडीने पावलं उचलत पुढील कार्यवाहीस सुरूवात केली आहे. सध्या प्रशासनाने रुग्ण राहत असलेला 150 मीटर पर्यंतचा परिसर सील केला असून रुग्णाच्या कुटुंबातील व संपर्कातील व्यक्तींना परसोडा येथील कॉरन्टाईन सेन्टरमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ग्रामीण भागातील चिंता वाढली…
तेली फैल येथे काल 2 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर प्रशासनाने 65 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठवले होते. त्याचा रिपोर्ट अद्याप बाकी असताना अचानक राजूरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने प्रशासनासह वणीकरांचीही चिंता वाढली आहे. वणीत तालु्क्यात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही 23 झाली आहेत. यातील 11 रुग्ण बरे झाले असून 12 रुग्ण अद्यापही ऍक्टिव्ह आहेत. आता कोरोना ग्रामीण भागातही पसरत असल्याने ग्रामीण भागातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

राजूर जिल्ह्यातील ‘मिनी इंडिया’
राजूर कॉलरी या गावाची ओळख जिल्ह्यात मिनी इंडिया म्हणून आहे. राजूर कॉलरीमध्ये महाराष्ट्रीयन, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडीशा, छत्तीसगड इत्यादी राज्यातील नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. अख्खा देशाची संस्कृती या एका छोट्याच्या गावात नांदते. राजूर परिसर हा चुनखडकासाठी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. इथे सुमारे 50च्या वर चुनाभट्टी आहेत. याशिवाय कोळसा खाण, गिट्टीखाण देखील आहेत. त्यामुळे रोजगारानिमित्त देशभरातून लोक इथे आलेले आहेत व वर्षांनुवर्षांपासून येथे ते राहतात. या गावातून बाजार, शिक्षण, कार्यालयीन इ कामासाठी वणीत सारखी येजा सुरू असते.

Leave A Reply

Your email address will not be published.