राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी

टिळक चौकातून काढण्यात आली दिंडी

जब्बार चीनी, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा या मागणीसाठी गुरुदेव सेवा समिती व भजन मंडळ निळापूर तर्फे दंडी काढण्यात आली. दिंडीनंतर तहसीलदार व आमदार यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजाला मानवतेचा संदेश दिला. त्यांचे विचार, साहित्याने लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी गुरदेव सेवा समिती व भजन मंडळ निळापूर तर्फे करण्यात आली आहे.

2003 पासून राष्ट्रसंतांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा ही मागणी गुरुदेव भक्तांची आहे. याबाबत अनेकदा शासनदरबारी निवेदन देण्यात आले. मात्र सरकारने त्याकडे कायम दुर्लक्ष केले. समाजसेवा, प्रबोधन यासह साहित्य आणि संगितातही राष्ट्रसंतांचे भरीव कार्य आहे. याशिवाय देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही राष्ट्रसंतांचा सहभाग होता. मात्र त्यांना अद्यापही भारतरत्न देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा अशी मागणी गुरुदेव भक्तांची आहे.

शुक्रवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी वणीतील टिळक चौकात निळापूर येथील महिला व पुरुष भजनी मंडळ तसेच परिसरातील गुरुदेव भक्त एकत्र आले. दुपारी 12 वाजता दिंडीला सुरुवात झाली. राष्ट्रसंतांचे भजन गात या दिंडी तहसील कार्यालयात पोहोचली. इथे तहसीलदार व आमदार यांना निवेदन देऊन राष्ट्रसंतांना भारतरत्न देण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात परिसरातील गुरुदेव भक्त उपस्थित होते.

Comments are closed.