मानवी जीवन व सृष्टीची वास्तविकता विवेकबुद्धीला प्रेरित करणारी असावी: तौफीक अस्लम

वणीत जमात-ए-इस्लामी हिन्दतर्फे स्नेहमिलन सोहळा पार

0

जब्बार चीनी, वणी: मानवी जीवन व सृष्टीची वास्तविकता सद्सद्विवेक बुद्धीला प्रेरित करणारी असावी, असे प्रतिपादन जमात-ए-इस्लामी हिन्दचे तौफीक अस्लम यांनी केले. वणीतील हाँटेल आस्वाद येथे या जमात-ए-इस्लामी हिन्दतर्फे आयोजित ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या स्नेहमिलन सोहळ्यात ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जमात-ए-हिन्दचे संदेश विभाग सदस्य प्रा. वाजीद अली खान होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक वैभव जाधव उपस्थित होते. दरम्यान यावेळी कोरोनाकाळातील पत्रकारितेसाठी शहरातील काही पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला.

जमात ए इस्लामी हिन्द तर्फे दिनांक 22 जानेवारी पासून ‘अंधारातून प्रकाशाकडे’ (फॉर्म द डार्कनेस टू लाईट) या राज्यव्यापी प्रबोधनात्मक अभियानाला सुरवात झाली आहे. हे अभियान 31 जानेवारीपर्यंत राज्यभर चालणार आहे. वणीत मंगळवारी दिनांक 26 जानेवारी रोजी आस्वाद हॉटेल इथील सभागृहात या अनुशंगाने स्नेहमिलन सोहळा घेण्यात आला.

यावेळी बोलताना प्रा. वाजीद अली खान म्हणाले की आम्ही दहा दिवसात महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोकाना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी, जनतेमध्ये एकोप्याची भावना रुजावी असा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन या दरम्यान करण्यात येत आहे.

वाजीद अली पुढे म्हणाले की कोरोना महामारीत भौतिकवादी लोकांचे डोळे उघडले आहेत. या स्थितीमुळे त्याचे सध्याचे विश्वास आणि कार्यशैलीमध्ये बदल होण्याची शक्यता जाहे. या गोष्टीची जाणीव वाटली आहे की जीवन फक्त संपत्ती गोळा करण्याचे नाव नाही कींवा भौतिक उद्देशांच्या परिपूर्तीच नाव नाही. शेवटी विवेक आणि करुणेशिवाय कुठलेही सुख नाही, असेही ते म्हणाले. 

आपल्या अध्यक्ष्यीय भाषणात तौफीक अस्लम म्हणाले की ज्ञान, उमेद, पावित्र्य, प्रगती, सन्मार्गदर्शन हा यशाचा स्रोत असावा. मानवी जीवन व सृष्टीची वास्तविकता सद्सद्विवेक बुद्धीला प्रेरित करणारी असावी. सा-या मानवजातीला आणि विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र कुरआन आणि पैगंबर मोहम्मद या स्रोताच्या अनुषंगाने प्रकाशमान जीवन व्यवस्था इस्लाममध्ये देण्यात आली आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सैरूयद अतिक यांनी केले. संचालन जिया रब यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अर्शद शहा यांनी केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते कोरोनायोद्धा म्हणून काही पत्रकारांचा सत्कार देखील करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.

जमात-ए-इस्लामी हिन्द ही एक सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत एक संस्था आहे. इस्लाम बाबतची शिकवण, गैरसमज, सामाजिक सलोखा, सौहार्द, शांतीचा संदेश देण्यासाठी ही संख्या गेल्या 73 वर्षापासून प्रयत्नशील आहे.

हे देखील वाचा:

भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

अवैधरित्या मुरूम उत्खनन व वाहतूक करणा-यांवर कार्यवाही

Leave A Reply

Your email address will not be published.