राज्यात रखडलेली शिक्षक भरती तत्काळ घ्या

गुरुदेव सेनेची मागणी, एसडीओंना निवेदन

0

विवेक तोटेवार, वणी: मागील दोन वर्षापासून राज्यातील शिक्षक भरती शासनाच्या उदासीन धोरणामुळे रखडून आहे. ती शिक्षक भरती तत्काळ भरण्यासाठी गुरुदेव सेनेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

२०१७ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलव्दारे शिक्षक पदाकरिता अभियोग्यता परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी लाखो सुशिक्षित बेरोजगार युवकांनी सहभाग नोंदवून परीक्षा दिली होती. परंतु या भरतीसाठी सरकारकडून या ना त्या कारणावरून सातत्याने चालढकलपणा करीत भरतीची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे भरतीची मेरिट यादी अद्यापपयंर्त घोषित करण्यात आली नसल्याने यातील अभियायोग्यता धारक परीक्षार्थींमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता काही दिवसातच लागू होणार आहे. परंतु सरकार मात्र या शिक्षक भरतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. एकीकडे केंद्रात हेच सरकार बिना यूपीएससीची परीक्षा न घेताच सचिव पदांच्या भरती करीत आहे. इकडे लाखो युवकांनी अभियोग्यता परीक्षा उत्तीर्ण करून देखील त्यांची यादी घोषित न करता त्यांना हक्काची नोकरी देण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप करण्यात आला. शिक्षक भरती तत्काळ घेण्यात यावी, अशी मागणी गुरुदेव सेनेचे संस्थापक गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृवात पुंडलिक मोहितकर, दीपक मोहितकर, सुमित लेडांगे,सचिन पिदूरकर, सागर बोथले,आशीष खरवडे, नितीन वाघाडे, राहुल वरारकर, ज्ञानेश्वर सूरतेकर, प्रणव सलामे, सीमा कुमरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.