सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव येथे पोलिसांनी कोंबडबाजारावर धाड टाकून सहा कोंबडे जप्त केलेत. पोलिसांनी ते पकडून पोलीस स्टेशनला आणलेत; परंतु हे कोंबडे पोलिसांनी हर्रास न करता स्वतः ठेऊन घेतलेत अशी सर्वत्र चर्चा आहे. कोंबडे जप्तीची किंवा कोणत्याही कार्यवाही दाखविली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. या धाडीतील सहा कोंबड्यांचं काय झालं? आणि आयत्या कोंबड्यांवर कुणाचा बडगा झाला, हा सवाल कायमच आहे.
अडेगाव येथे बडग्यानिमित्त खातेरा, वेदड व डोंगरगाव येथील काही शौकीनांनी पाण्याच्या टाकीजवळ काती बांधून कोंबडबाजार भरविला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलीस जीप घेऊन काही पोलीस कर्मचारी व होमगार्ड गेलेत. धाड टाकून फक्त कोंबडे पकडून इतर लोकांना सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे.
कोंबडबाजारात कोंबडे पकडताना एका होमगार्डच्या हाताला मोठी जखमसुद्धा झाल्याची माहिती मिळाली आहे. कोंबडबाजारात अडेगाव येथील जगदीश, सुनील व मंगल यांच्याजवळील एक-एक कोंबडा, डोंगरगाव येथील एक व इतर गावातील लोकजवळील दोन असे एकूण सहा कोंबडे पोलिसांनी आणलेत. परंतु एकही कोंबडा हर्रास न करता पोलिसांनी या कोंबड्यांवर ताव मारून बडगा साजरा केल्याच्या खमंग चर्चा परिसरात सुरू आहेत.
या प्रकारामुळे परिसरातील जनतेमध्ये पोलिसांप्रती संताप व्यक्त होत आहे. हर्रास कोंबडे कुणी घेतले याबाबत विचारणा केली असता, याबत कुणीही बोलायला तयार नव्हते. कार्यवाहीच्या नावावर पोलिसांनी धाड टाकून लोकांचे कोंबडे आणून फस्त करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुकुटबन पोलिसांनी केलेल्या कृत्याची अडेगाव मुकुटबनसह परिसरात खमंग चर्चा सुरू आहे. कार्यवाहीच्या नावावर पोलीस गाडी घेऊन असे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ठाणेदार यांचा वचक नसल्याने असे प्रकार सुरू असल्याचीही चर्चा सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी याबाबत चौकशी करून दोषींवर कर्यवाही करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.


