विविध विषयांसाठी माकप व किसानसभेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

त्रिपुरा हिंसाचार व कंगना राणावत यांच्या वक्तव्याचा निषेध व संबंधितांवर कारवाईची मागणी

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्रातील लाल परी म्हणजे एसटी बस ही राज्यातील जनतेसाठी महत्वाचे प्रवासाचे साधन आहे. ही एसटी बस ही महामंडळाच्या माध्यमातून चालविली जात असल्याने एसटी कर्मचारी अनेक शासकीय सुविधेपासून वंचित आहेत.

त्याकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळ बरखास्त करून शासनात विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून सर्वच सुविधा द्यावीत या करिता बेमुदत संप पुकारला आहे. ह्या संपाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने पाठिंबा व्यक्त करीत वणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्रिपुराच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या घटनेचा माकपने निवेदनातून निषेध व्यक्त करीत लोकशाही व संविधानाच्या विरोधात जाऊन दंगे घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री कंगना राणावत हिने 1947 ला भारताला स्वातंत्र्य भिके मध्ये मिळाले असून खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाल्याचे व्यक्तव्य केले.

असे व्यक्तव्य करून या देशासाठी लाखोंच्या संख्येने बलिदान करणाऱ्यांचा तिने अपमान केला. तिचे हे वक्तव्य देशाच्या स्वातंत्र्यात कुठलेही योगदान नसणाऱ्या आरएसएसच्या बीजांकुरातून निर्माण झालेले असल्याने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत तिच्या ह्या वक्तव्याचा निषेध माकप व किसान सभेने मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

दिनांक 15 नोव्हेंबर रोजी माकप व किसान सभेने वणीचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर कॉ. शंकरराव दानव, कॉ.ऍड. दिलीप परचाके, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. मनोज काळे, कैलास मोंढे, दत्तूभाऊ कोहळे, मधुकर गिलबिले, तुलसीदास सातपुते,दिलीप लटारी ठावरी आदींच्या सह्या आहेत.

Comments are closed.