आवास योजनेचे रखडलेले हप्ते द्या

घरकुल लाभार्थ्यांचा उपोषणाचा इशारा

0

नागेश रायपुरे, मारेगाव : नगर पंचायत मारेगाव अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील अनेक लाभार्थी तिसऱ्या हप्त्यापासून वंचीत आहेत. त्यामुळे रखडलेल्या बांधकामासाठी उर्वरित हप्ते तात्काळ द्यावेत. या मागणीचे निवेदन लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी यांना मंगळवारी दिलेत. जर आठ दिवसात हप्ते न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

दोन वर्षांंपूर्वी मारेगाव नगर पंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचा एकूण 251 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. यातील काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता रुपये 40 हजार, तर काही लाभार्थ्यांना पहिला 40 हजार व दुसरा 60 हजार असे एकूण रुपये एक लाख मिळालेत. मात्र मागील सहा-सात महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरसुध्दा तिसरा हप्ता मिळाला नाही.

त्यामुळे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने बेघर झालेल्या लाभार्थ्याना उघड्यावर संसार थाटावा लागत आहे. या लाभार्थ्यांनी अनेकदा हप्ता मिळण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले. परंतु समस्या सुटल्या नाहीत. आता आठ दिवसांत घरकूल लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते मिळण्यात यावेत.

न्यथा नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल. असा इशारा नगरपंचायतीमार्फत मुख्यमंत्री यांना घरकूल लाभार्थ्यानी दिलेल्या निवेदनामधून दिला आहे. यावेळी प्रशांत नांदे, दत्तू लाडसे, राजू कोहचाडे, अजाब नांदे, श्रीकांत गोखरे, उत्तम कनाके, विजय राजुरकर यांच्यासह घरकूल लाभार्थी उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.