बंदी असलेल्या तणनाशकाची शेतक-यांमध्ये मागणी

सीमेलगतच्या जिल्ह्यातून छुप्या रितीने कीटकनाशक दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे रेंगाळलेल्या पिकांच्या पेरण्यांना वेग आला. अशा वेळी शेतात वाढणाऱ्या तणांकडे दुर्लक्ष करता येत नाही. तणांमुळे पिकांच्या उत्पादनवाढीवर परिणाम होतो तसेच त्यांचा दर्जाही खालावतो. त्यामुळे तणनाशकांचा वेळीच नायनाट करणे भाग पडते. गत आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. पावसाने थोडी उघडीप देताच कोळपणी, फवारणीच्या कामांना शेतकर् यांनी वेग दिला. दरम्यान, अनेक ठिकाणी मजुरांचा अभाव दिसत असल्याने आणि काही ठिकाणी मजुरीचे दर गगनाला भिडल्याचे पाहून शेतकरी तणनाशकाच्या फवारणीला पसंती देत असल्याचे कृषी सेवा केंद्रातील गर्दीवरून दिसून येते.

फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात अनेक शेतकर्‍यांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे, शासनाने कीटकनाशक औषधांचे नमुने घेऊन १३ औषधांच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे. मात्र जिल्ह्यातील कापूस व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात बंदी असलेले ग्लायसोफेट या तणनाशकाची मागणी जोरात असून काही अवैध विक्रेते परप्रांतातून व सीमेलगतच्या जिल्ह्यातून छुप्या पद्तीने राउंडअप औषधी आणून ज्यादा दराने विक्री करीत असल्याचे दिसत आहे. तर तेलंगाना व चंद्रपूर जिल्ह्याचे सीमेलगत असलेले गावातील शेतकरी आदिलाबाद, कोरपना, बेला, चंद्रपूर येथून औषध आणून वापर करीत आहे.

माहितीनुसार राज्य शासनाने विक्रीस मंजूरी असलेले हिटविड या तणनाशक औषधीचे दर मागील वर्षी २३०० रुपये प्रती लिटर व सध्या २७०० रु. प्रती लिटर आहे, तर दुसरीकडे बंदी असलेले ग्लायसोफेट तणनाशकचे दर फक्त २०० ते २२५ रु. प्रती लिटर असून शेतकरी ३०० ते ४०० रु. लिटरच्या भावाने खरेदी करीत आहे. तसेच झाडांची गळती थांबिण्यासाठी वापरण्यात येणारे असेफेट पावडर ज्याला स्थानिक भाषेत असाटाफ बोलल्या जाते त्याची किमत ४०० रु. प्रती किलोग्राम असून बंदी असल्यामुळे शेतकरी बाहेरून ५५० ते ६०० रु. प्रती किलोग्रामच्या दराने खरेदी करीत आहे. राज्यात कापूस उत्पादक शेतकरी मागील अनेक वर्षापासून फवारणी करीत असलेले मोनोक्रोटोफास या कीटकनाशाकावरसुद्धा यवतमाळ जिल्ह्यात बंदी घातलेली असून ३०० ते ३२५ रु. प्रती लिटरची या औषधी शेतकरी पर जिल्ह्यातून ४०० रु. लिटर या चढ्या दराने खरेदी करून फवारणी करीत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात बंदी असताना शेतकरी बाहेर जिल्ह्यातून किंवा परप्रांतारून कीटकनाशक व तणनाशक औषधी खरेदी करीत असून शेतकर्यांचे मोठे प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात बंदी असलेले कीटकनाशकांवर बंदी उठवून त्या कीटकनाशकांची फवारणी करताना कशी सावधानी बाळगावी असा मार्गदर्शन शेतकरी बांधवाना करण्याची दक्षता जर कृषी विभागाने घेतली तर शेतकर्यांना आर्थिक नुकसानी पासून वाचवता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.