संत नामदेव महाराजांचा 673 वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संत नामदेव महाराज यांची कारकीर्द तेराव्या आणि चौदाव्या शतकातली आहे. तरीदेखील त्यांचे विचार आजही सार्वकालिक ठरतात. ते सर्वच काळात सारखेच लागू होतात. ते नीट समजून त्यांच्या विचारांवर कृती करणे ही काळाची गरज आहे. असं प्रतिपादन ज्ञानदा परीक्षाकेंद्राचे संचालक वैभव ठाकरे यांनी केलं. ते संत नामदेव शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेद्वारे आयोजित श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर उज्वलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून सुरेश किटे, अरुण वाढई, रामकृष्ण बिडकर, मोहन हरडे, अनंता जुमडे, उदयपाल वणीकर, सुनील इंदुवामन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा टागोर चौकातील विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.

पुढे बोलताना वैभव ठाकरे यांनी व्यक्तिगत तसेच सामूहिक प्रगतीवर विशेष भर दिला. ते म्हणाले की, संत नामदेव महाराजांची प्रेरणा घेऊन शिंपी समाजाने विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करावी. युवकांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रगती करावी. भरपूर ज्ञानार्जन करावे. त्याचा उपयोग स्वतःसाठी आणि संपूर्ण समाजासाठी करावा. कीर्तनकार तथा प्रबोधनकार उदयपाल वणीकर यांनी आपल्या खास विनोदी शैलीतून अनेक गंभीर विषयांवर प्रहार केलेत. एकात्मतेचं महत्व त्यांनी उपस्थितांना विशद केलं. विवाहात होणारी उधळपट्टी टाळून सामूहिक विवाह विवाहाचा आग्रह धरला. सोबतच सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

यावेळी सुनील इंदुवामन ठाकरे यांनी संत नामदेव महाराजांच्या जीवन व कार्यावर संवाद साधला. संत नामदेवांचं काव्य, संघटन कौशल्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावरचं कार्य, प्रबोधन पर्व अशा विविध विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला. संत नामदेव महाराज हे त्या शतकातील विद्रोही नायक होते. त्यांनी साडेसातशे वर्षांपूर्वी केलेलं कार्य म्हणजे महान क्रांती होय. संत नामदेव महाराजांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मार्गदर्शक सूचना केल्यात. त्यांचं पालन केलं की, यशाचा मार्ग मोकळा होईल. अशा संत नामदेव महाराजांच्या अनेकविध अंगांवर ठाकरे यांनी प्रकाश टाकला.

या सोहळ्यानिमित्त घटस्थापना झाली. महिला आणि पुरुषांची स्वतंत्र भजनं झालीत. दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झालं. या निमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. शोभायात्रा आणि दहीहंडी झाली. अनेक चिमुकल्यांनी संत नामदेव महाराजांची वेशभूषा साकारली. कार्यक्रमाचं संचालन देवेंद्र बच्चेवार यांनी केलं. प्रास्ताविक कुंतलेश्वर तुरविले यांनी केलं. आभार सुरेश किटे यांनी मानलेत. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

आयोजनात मोरेश्वर उज्वलकर, कुंतलेश्वर तुरविले, सुरेश किटे, श्रीकांत बहादे, प्रभाकर उज्वलकर, उदय वाढई, अशोक ढाले, रामकृष्ण बिडकर, मारुती देवगिरकर, जनार्दन किटे, अनिल जुमडे, अभय जुमडे, सुरेश ढपकस, दिलीप सहस्त्रबुद्धे, निशा उज्वलकर, कल्पना किटे, कांता उज्वलकर, प्रभात तुरविले यांची महत्त्वाची भूमिका राहिली. या सोहळ्याला वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील बहुसंख्य समाजबांधवांची उपस्थिती होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed.