बहुगुणी डेस्क, वणी: आयुष्याचा प्रवास कधी आणि कसा संपेल याचा भरवसा नाही. आत गेलेला श्वास बाहेर येईलच याचीही खात्री नसते. असाच प्रसंग वणी-वरोरा राज्य महामार्गावरील रेल्वे फाटकाजवळ घडला. श्रीचंद राजपूत बिहारी (शैला) (50) हा ट्रकचालक मृतावस्थेत आढळून आला. शनिवार दिनांक 28 जूनला सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ते एका ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून काम करीत होते. त्याला हृदय विकाराचा झटका आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
श्रीचंद राजपूत हे मूळचे बिहार राज्यातील रहिवाशी होते. ते अनेक वर्षांपासून खांदला येथे वास्तव्यास होते. अनेक वर्षांचा ट्रक चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी होता. प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांनी तशी सूचनाही ट्रान्सपोर्ट मालकाला फोनवर दिल्याचं सहकारी ड्रायव्हरचं म्हणणं आहे.
श्रीचंद यांनी कोलारपिंपरी कोळसाखाणीतून कोळसा भरून आणला. नंतर वेकोलिच्या रेल्वे सायडिंगवर कोळसा खाली केला. त्यानंतर रेल्वे सायडिंगवरून मुख्य मार्गाकडे येत असताना रेल्वे फाटकाजवळ ट्रक उभा केला. त्याचवेळी त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. ट्रान्सपोर्ट मालकाला तिथूनच फोन केला. मात्र क्षणातच व्हृदय विकाराचा झटका आला. ट्रकचालक श्रीचंद राजपूत बिहारी यांचा मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे.
आपल्या कामात प्रामाणिक राहून काळजीपूर्वक वाहन चालवणारे श्रीचंद यांचं जाणं सर्वांना धक्कादायक होतं. कुटुंबवत्सल आणि सहृदयी असल्यानं त्यांच्या कुंटुंबावर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली. रेल्वे सायडिंग हद्दीतच ही घटना घडली. त्यामुळे मृताच्या कुटुंबाला वेकोलि तथा ट्रान्सपोर्ट कंपनीकडून अर्थसहाय्य मिळण्यची अपेक्षा होत आहे. श्रीचंद राजपूत बिहारी (शैला) यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळलं नाही. शवविच्छेदन अहवालातूनच ते स्पष्ट होईल.





Comments are closed.