उचा’पती’ समाजसेवक ‘कवडू’चा आता बायकोच्या आडून हैदोस

बायकोच्या नावाचे शुभेच्छा बॅनर लावा, नाहीतर तक्रार... कवडूचे नवे कारनामे समोर

बहुगुणी डेस्क: समाजसेवेचा बुरखा पांघरून वावरणाऱ्या वणीतील कवडू नामक एका स्वयंघोषित व उचापती समाजसेवकाची सध्या शहरभर चर्चा रंगली आहे. स्वतःच्या तक्रारींना प्रतिसाद मिळेनासा झाल्यानंतर आता त्याने पत्नीच्या नथीतून तक्रारीचा बाण मारण्यास सुरुवात केली आहे. पत्नीच्या नावाचा आधार घेत अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिकांवर दबाव टाकण्याचा नवा फंडा या उचा’पती’ने अवलंबला आहे. या प्रकारामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचारी मानसिक त्रासाला सामोरे जात असून, या भुरट्या समाजसेवकाचे तक्रारीचे भूत उतरवावे, अशी मागणी सध्या नागरिकांकडून होत आहे.

कुणाला गाण्याचा, कुणाला खेळाचा, कुणाला खाण्याचा तर कुणाला समाजकारणाचा छंद असतो. पण कवडू नामक या तोतया समाजसेवकाला लोकांच्या तक्रारी करण्याचाच छंद आहे. शहरातील असे एकही कार्यालय उरले नाही, जिथे त्याने तक्रार केली नाही. सुरुवातीला अधिकारी, कर्मचारी सततच्या तक्रारीमुळे दडपणाखाली यायचे. मात्र बहुतांश तक्रारींमध्ये तथ्य आढळत नसल्याने पुढे कारवाई होत नव्हती. परिणामी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने त्याला भाव देणे बंद केले. स्वतःच्या तक्रारीला भाव मिळत नसल्याने कवडूने नवी शक्कल लढवली. अलिकडेच त्याची पत्नी प्रतिनिधी झाली. त्यामुळे आधी स्वतः तक्रार करायची आणि नंतर तीच तक्रार पत्नीच्या नावाने पुन्हा पाठवायची. पत्नीच्या नावाचा वापर करून दबाव टाकावा, असा त्याचा कुटील उद्देश आहे.

तक्रार एक्सप्रेसला बायकोचा डबा जोडला !
पत्नी एका मोठ्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे. त्यामुळे कवडूने सध्या तिच्या पक्षाच्या लेटरहेडवरून विविध कार्यालयांना तक्रारी पाठवण्याचा सपाटा लावला. “तक्रारीची दखल घेतली नाही तर पक्षा तर्फे आंदोलन करू,” अशी धमकीही तो देतो. इतकेच नव्हे तर, तक्रार मागे घेण्यासाठी “पत्नीच्या नावाने चौकात शुभेच्छा बॅनर लावा”, “कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा”, “वृत्तपत्रात शुभेच्छा जाहिरात प्रसिद्ध करा”, अशा अटी घालून नंतर तडजोडीचा प्रस्ताव दिला जातो. वाद नको म्हणून काही अधिकारी आणि कर्मचारी नमती भूमिका घेत असल्याचे बोलले जाते. गेल्या काही दिवसात कवडूचे अनेक किस्से चर्चीले जात आहे.

कुणी बायकोला शुभेच्छा देता का शुभेच्छा !
शहरातील एका प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्याची अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. संबंधित व्यक्ती खासगी पण शासन अनुदानित संस्थेत कार्यरत आहे. त्याला कवडूने त्याच्या पत्नीच्या नावाने चौकात शुभेच्छा बॅनर लावण्याची मागणी केली. मात्र, आपण एका पक्षाचा पदाधिकारी असल्याने दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला शुभेच्छा देणे योग्य ठरणार नाही, असे कारण देत त्याने नकार दिला. यानंतर त्याच्याविरोधात “शासकीय कर्मचारी असूनही राजकीय काम करतो” अशी तक्रार करण्यात आली आणि त्याला सेवेतून निलंबित करण्याची मागणी कवडूने तक्रारीतून केली. मात्र तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याने फुगा फुटल्यावर जसा फुस्स आवाज येतो, तशी परिस्थिती कवडूच्या तक्रारीची झाली. त्यामुळे कवडूचा तिळपापड झाला.

त्यानंतर त्याने जिल्हा व राज्य पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रारींचा सपाटा लावला. या प्रकारामुळे संबंधित कर्मचारी प्रचंड मानसिक तणावात गेला. अनेकांनी कवडूला समजावून सांगितले की, संबंधित व्यक्ती शासकीय कर्मचारी नसून मानधन तत्त्वावर कार्यरत आहे. मात्र कवडू कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. “बायकोला शुभेच्छा दिल्या नाहीत, आता त्याची नोकरीच खातो,” अशा डिंगा तो हाणू लागला. जवळपास महिनाभर त्याने संबंधित कर्मचाऱ्याचा मानसिक छळ केला. अखेर चौकशीत तक्रारीत कोणतेही तथ्य आढळले नाही. संबंधित व्यक्ती शासकीय कर्मचारी नसून मानधन तत्त्वावर कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच अशा कर्मचाऱ्यांना राजकीय प्रचारात सहभागी होण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचेही समोर आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे बोलवा
शहरात एका दिनविशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील निष्कलंक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या एका कार्यकर्त्याने यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रम होणार असल्याचे कळताच कवडू त्या व्यक्तीकडे गेला. त्याने त्याच्या पत्नीला कार्यक्रमाचे अध्यक्ष बनवा किंवा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा, अशी गळ घातली. मात्र सदर कार्यक्रमात कोणीही अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व हारतुरे असे काही नियोजन नसल्याचे त्याने सांगितले. तसेच कार्यक्रम सार्वजनिक असल्याने कुणीही कार्यक्रमात सहभागी होऊ शकते. तुम्ही देखील सपत्नी या असे आमंत्रणही दिले. मात्र मान न मिळाल्याने कवडू आतून जळत होता. कार्यक्रम लो बजेट असल्याने चार ते पाच लोकांनी स्वत:च वर्गणी काढली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. शहरातील नेते, प्रतिष्ठीत व्यक्तींनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
कार्यक्रमानंतर कवडूने अवैध धंदेवाल्यांकडून खंडणी गोळा करून कार्यक्रम केला. सर्वसामान्य लोकांकडून वर्गणी गोळा करून पैसे खाल्ले, असे आरोप करून बदनामी करण्याचा सपाटा सोशल मीडियातून लावला. याची तक्रार शहरापासून जिल्ह्याच्या ठिकाणी केली. पुढल्या कार्यक्रमात बायकोला प्रमुख पाहुणे बोलवा आणि खंडणी गोळा केल्याबद्दल माफी मागा, असा प्रस्ताव कवडूने पाठवला. रोजची सोशल मीडियातून होणारी बदनामी यामुळे संबंधीत कार्यकर्त्याने अखेर कवडू विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोणताही पुरावा नसल्याने आता कवडू पुरता अडकला होता. अखेर कवडूने एकमेकांविरोधातील तक्रार मागे घेऊन प्रकरण मिटवू, असा प्रस्ताव पाठवला.

निवडणुकीत मोठा झटका
परिसरात एका निवडणुकीचे वारे वाहू लागले. माझी बायको प्रतिनिधी आहे. त्यामुळे आता निवडणुकीत किमान 10 लाख रुपये कुठे गेले नाही, अशा फुशारक्या मारत कवडू शहरभर फिरत होता. कवडूने अधिकाधिक कमाई करण्यासाठी पक्षाचे तत्व बाजूला ठेवत सर्व पक्षांकडे फिल्डिंग लावली. जो जास्त देणार तिकडे जाणार, अशी भूमिका घेतली. मात्र निवडणूक झालीच नाही. त्यामुळे कवडूच्या हाती निराशा आली. लाखोंचं नुकसान झाल्याने कवडू या धक्क्यातून सावरला नाही. दोन दिवस तो घराबाहेर पडला नाही, असे घरा शेजारील व्यक्ती सांगतात. अखेर तिस-या दिवशी त्याने बाहेर येत निवडणूक अवैध आहे, अशी तक्रार करत जीव शांत केला.

माफी मागत केली हमाली
सहा सात महिन्यांपुर्वीची घटना आहे. एके दिवशी कवडू कडक ‘शिस्त’ अशी ओळख असलेल्या एका शासकीय कार्यालयात गेला. त्यावेळी गेटवरील कर्मचाऱ्याने काही कारणास्तव त्याला तत्काळ आत जाण्यास मनाई केली. त्यावर कवडू चांगलाच संतापला. मी परिसरातील सर्टिफाईड समाजसेवक आहे. माझी बायको अमुक आहे. मी तमुकचा नवरा आहे, असे सांगत कर्मचा-याशी हुज्जत घातली. आरडाओरड ऐकून साहेब बाहेर आले. साहेबांनी विचारणा केल्यावर कवडू विनाकारण वाद घालत असल्याचे आढळले. साहेबांनी कवडूचा जागीच ‘फैसला’ करण्याचे ठरवले. हा शासकीय कामात अडथळे निर्माण करत आहे, आताच्या आता पोलिसांना बोलवा आणि याला आत टाका अशी ‘ऑर्डर’ साहेबांनी कर्मचा-याला दिली.
आता गुन्हा दाखल होणार हे कळताच कवडू रडवेल्या चेह-याने हात पाय जोडत माफी मागू लागला. कारवाई न करण्यासाठी गयावया करू लागला. यावेळी कवडू कार्यालयात त्याची व्यावसायिक कामासाठी वापरण्यात येणारी चारचाकी घेऊन आला होता. ‘तुमचा गुलाम, हमाल, घोडी काहीही बनेन’ अशी विनवनी त्याने केली. अखेर कर्मचा-याने साहेबांना माफ करण्याची विनंती केली. साहेबांनी कवडूला हमालीचे काम दिले. कार्यालयातील जुन्या वस्तू व कचरा गाडीत टाकून शहराबाहेर फेकण्याची ‘ऑर्डर’ कवडूला देण्यात आली. कवडूने देखील हसत खेळत हमाली केली. यावेळी गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने कवडूची केवळ चड्डी ओले होणे बाकी होते, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात.

लेटरहेडचा दुरुपयोग आणि खंडणीचा धंदा
एखाद्याच्या मागे लागून सातत्याने व वरपर्यंत तक्रार देणे, त्यातून मानसिक त्रास देणे व त्यातून ‘अर्थ’पूर्ण कामे करून घेणे. हा सध्या कवडूचा धंदा बनला आहे. एखाद्या तक्रारीवर अपेक्षित कारवाई झाली नाही, की संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरच पक्षपातीपणाचे किंवा गैरव्यवहाराचे आरोप करत वरिष्ठांकडे तक्रारी पाठवायच्या, असे प्रकारची कवडूने केले आहे. पत्नीच्या राजकीय पक्षाच्या लेटरहेडचा वापर करून विविध कार्यालयांकडे तक्रारी पाठविणे आणि “पक्षातर्फे आंदोलन करू” असा इशारा देत दबावाचे वातावरण निर्माण करण्याचा सपाटा कवडूने लावला आहे. आता या प्रकाराकडे संबंधित राजकीय पक्ष लक्ष देणार का, की कवडूच्या या भुरट्या कृत्यांना पक्षाचे संरक्षण मिळत राहणार, असा प्रश्न शहरवासीयांमधून उपस्थित होत आहे. तक्रार यंत्रणेचा वापर जनहितासाठी व्हावा, वैयक्तिक दबावाचे साधन म्हणून नव्हे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (खालील लिंकवर भाग १)

सावधान… कवडू आलाये ! भुरट्या समाजसेवकाचा हैदोस

Comments are closed.