वणीकर म्हणताहेत ‘बुलाती है मगर, जानेका नही’

वीजेच्या खेळखंडोब्यामुळे वणीकर त्रस्त

0

जब्बार चीनी, वणी: वणी येथील विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे वणीकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. मेंटनन्स व ट्री कटींगच्या नावावर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. गेल्या 15 तासात 25 पेक्षा अधिक वेळा लाईट गेली हे विशेष. त्यामुळे वणीकर जनता ‘जानेका नही’ असे आर्जव करताना दिसत आहे.

वीज दुरुस्तीचे काम नियोजन न करता वेळी अवेळी दुरुस्तीचे कामे करुन वीज पुरवठा बंद करण्यात येत आहे. अचानक अवेळी वीज पुरवठा खंडित होत असून शहरातील वीजेवर अवलंबून असणार्‍या व्यवसायिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी वीज दुरुस्तीच्या कामाचे नियोजन अद्यापही नसल्याने वादळ व अल्प पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित होत असून पावसाळा सुरु होताच वीज पुरवठा यंत्रणेचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

पॉव्हर कट मुळे वणीकरांच्या मागे कटकट… 
पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कधीकधी दिवसभर हा वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नाही. यामुळेच मान्सून पूर्व (प्री-मान्सून) विस्कळीत झालेल्या वीज तारा, वीज खांबासह इतर प्रकारची दुरुस्ती करण्याचे नियोजन महावितरणच्यावतीने करण्यात येते. यंदाही हे नियोजन केले गेले परंतू लॉकडाऊनमुळे या कामास दिरंगाई झाली असली तरी महावितरण याबाबत गंभीर नसून, अद्याप यातील बहुतांश कामांना सुरुवातच झाली नसल्याचे वास्तव आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात.

वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्युज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, वीज तारांजवळील झाडांच्या फांद्याची छाटणी, भूमिगत वीजवाहिनी टाकणे, जुन्या फिडर पिलरमध्ये ‘इन्सूलेशन स्प्रे’ मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे.

महावितरण वणी अंतर्गत या कामांचे शेड्यूल तयार असून अद्यापही बहुतांश ठिकाणी कामांना प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे वेळीच दुरुस्तीचे कामे निघत असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा वीज ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. तसेच परिसरातील शेतकरी वीज सुरळीत नसल्यामुळे अडचणीत सापडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.