रानडुकरांनी केले शेतातील पिकांचे नुकसान

नुकसान भरपाई देण्याची शेतक-यांची मागणी

0

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील अहेरल्ली येथील अल्पभूधारक शेतकरी दादराव दादाजी राउत यांच्या शेतात रानडुकराने कपाशीच्या उभ्या पिकात धुमाकुळ घातला. यात त्यांची कापुस बोंडांनी भरून उभी असलेली कपाशी जमीनदोस्त केली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे त्यांच्याच शेतात नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात हा प्रकार पहावयास मिळतो. त्यामुळे तालुक्यातला शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

कधी रानडूकराचा हल्ला तर कधी रोहीचा हल्ला, तर कधी वाघाचा हल्ला असे चित्र झरी तालुक्यात वारंवार पहावयास मिळत आहे. त्यामुळे जगावे की मरावे अशी परिस्थिती या तालुक्यातील शेतकरी वर्गावर असते. गेली अनेक दिवस वाघाचे संकट होते. नंतर कीटकनाशकांमुळे अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली. तर आता बोडअळी व वन्यप्राण्यानी शेतातील पिकांवर हल्ला चालवला आहे.

दादाराव राउत सारखे अनेक अल्पभूधारक शेतकरी या तालुक्यात आहे. व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा फक्त शेतीवर अवलंबून असतो. मात्र हातात आलेले पीक जर हातून जात असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. या सर्व प्रकाराकडे संबंधीत यत्रणेने लक्ष देऊन कागदी घोड़े न नाचवता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.

झरी तालुका हा जंगली भागात बसलेला तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या वन्यप्राण्याचा सामना करावा लागतो. या तालुक्यातील कोणाच्या शेतात कोणता प्राणी येईल आणि पिकाचे व जीवित हानी करेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे रानटी प्राण्यांचा प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.