भारत दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर तिस-या क्रमांकाचा देश

यादीत भारत पाकिस्तानच्याही पुढे

0

नवी दिल्ली: भारत हा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर तिस-या क्रमांकावर असल्याचं समोर आलं आहे. २०१६ या वर्षात इराक आणि अफगाणिस्ताननंतर भारतात सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाल्याचे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटद्वारे सादर केलेल्या एका अहवालात सांगण्यात आले आहे. या यादीत भारत पाकिस्तानच्याही पुढे आहे.

अमेरिकेच्या ‘एनसीएसटीआरटी’ या दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार २०१६ मध्ये जगभरात जवळपास ११ हजार ७२ दहशतवादी हल्ले झाले. यापैकी ९२७ म्हणजेच १६ टक्के दहशतवादी हल्ले भारतात झाले. ही संख्या २०१५ साली ७९८ इतकी होती, ज्यात जखमींची संख्या ५०० च्या आसपास होती. २०१६ मध्ये जखमींची संख्या ६३६ एवढी झाली. पाकिस्तानमध्ये २०१५ मध्ये दहशतवाद्यांचे हल्ले १०१० इतके होते जे २०१६ मध्ये ही संख्या ७३४ म्हणजेच २७ टक्क्यांनी कमी झाल्याची नोंद आहे.

भारतात २०१६ या वर्षात जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, मणीपूर आणि झारखंडमध्ये जास्तीत जास्त दहशतवादी हल्ले झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ९३ टक्क्यांनी दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये ५४.८१ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.

‘एनसीएसटीआरटी’च्या अहवालानुसार जगभरात अस्थिरता निर्माण करण्यात नक्षलवादी संघटना ही सर्वात घातक असून ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. याबाबतीत इसिसचा पहिला तर तालिबान या संघटनेचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या वर्षातील ३३४ दहशतवादी हल्ले नक्षलवाद्यांनी केल्याचे यात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.