वणी नगरपालिका सोमवार पासून प्रशासकाच्या हाती

नगरपरिषद प्रशासक म्हणून तहसीलदारांची नियुक्ती

जितेंद्र कोठारी, वणी: राज्य शासनाने मुदत संपलेल्या पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या 2 जानेवारी 2022 पासून वणी नगर परिषदेचे प्रशासन प्रशासकाच्या हाती येणार आहे. वणी नगर परिषदचे कार्यकाल 1 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. राज्य शासन नगर विकास विभागाच्या आदेशानुसार 2 जानेवारी 2022 पासून वणी नगरपरिषद प्रशासक म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वणी नगर परिषदेवर मागील 5 वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. पालिकेत 26 नगरसेवकांपैकी 22 नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. नगराध्यक्षची निवडणूकही थेट जनतेतून करण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे तारेंद्र गंगाधरराव बोर्डे हे 5 हजारपेक्षा जास्त मताने निवडून नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले.

मागील 5 वर्षांपासून नगर परिषदतर्फे शहरात अनेक विकास कामे करण्यात आले. त्यात प्रामुख्याने 15 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना आणून अनेक वर्षांपासून सुरु पाणी टंचाई समस्येवर मात करण्यात आली. शहरात विविध भागात तब्बल 11 बगिचेही नगरपरिषद तर्फे फुलविण्यात आले. 10 कोटीच्या निधीतून भव्य सांस्कृतिक भवन, 16 वाटर एटीएम, मटण व्यावसायिकांसाठी 40 दुकाने, सर्व सोयीयुक्त 7 स्त्री पुरुष प्रसाधनगृह या काळात उभारण्यात आले. संपूर्ण शहरात भूमिगत गटार व अंतर्गत रस्ते बांधण्यात आले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानीसह 2 स्वतंत्र इमारतीचे बांधकाम नगरपालिका निधीतून करण्यात आले.

नगराध्यक्ष यांच्या पुढाकाराने नगर परिषद अधिनस्त सर्व शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आली. अनेक वर्षांपासून धूळखात असलेली कल्याण मंडपम इमारतीची दुरुस्ती करून पूर्ववत करण्यात आली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा संकलनासाठी 17 वाहने खरेदी करण्यात आले. शहरातील रस्त्यांवरील एलईडी पथदीप लावण्यात आले. लाखों रुपयांच्या खनिज विकास निधीतून दीपक टाकीज ते जंगली पीर, नांदेपेरा मार्ग डीबी रोड, साई दरबार ते बजरंग कॉलोनी, खाती चौक ते तुटी कमान आणि आठवडी बाजार ते घुग्गुस बायपास या रस्त्यांचे कामही करण्यात आले.

कोरोना काळात नगर परिषद यांनी अतिशय चोख कामगिरी बजावली होती. गरीब कुटुंबातील नागरिकांना 6 हजार धान्य किट वाटप करण्यात आली. तर कोरोना रुग्णांसाठी 100 बेडचे आईसोलेसन वार्ड ही तयार कण्यात आले. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता नगराध्यक्ष स्वतः रस्त्यावर उतरले होते.

5 वर्षात नगरपालिकेवर एकही मोर्चा नाही – तारेंद्र बोर्डे
वणीच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले की, वणीकर नागरिकांना आपली समस्यांना घेऊन नागरपालिकेवर मोर्चा काढण्याची गरज पडली नाही. पाणी टंचाई समस्येचे कायमस्वरूपी समाधान झाले आहे. शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे मला सलग 5 वर्ष चांगल्याप्रकारे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. वणीकर जनतेचा आभारी आहो.
– तारेंद्र बोर्डे: नगराध्यक्ष न.प. वणी

हे देखील वाचा:

वणी उपविभागाला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले

पर्यावरणाचा संदेश घेऊन वणीत निघाली सायकल रॅली

शेतात तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Comments are closed.