पुरुषोत्तम नवघरे, वणी: रहिवासी, उत्पन्न, जातीचा व अन्य दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना सेतू केंद्राचाच मुख्य आधार असतो. मात्र
वणी तहसील कार्यालयाच्या लगत असलेलं सेतू सुविधा केंद्र बंद पडलं. ठराविक दरांपेक्षा जास्त रक्कम घेतल्याच्या कारणांवरून जिल्हाधिकाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी ते बंद केलं होतं. यामुळे नागरिकांना विविध दाखले मिळवण्यासाठी अडचण होत आहे.तसेच इतर शासकीय कामांसाठीही त्यांची गैरसोय होत आहे. म्हणूनच मनसेने वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. ते सुरू करण्याची मागणी केली.
खरीप हंगाम सुरू झाला आहे. या काळात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांसाठी, कर्जांसाठी तसेच अन्य कामांसाठी विविध शासकीय दाखल्यांची गरज भासते. सोबतच नवं शैक्षणिक सत्रही सुरू झालं. प्रवेश आणि अन्य कामांसाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, चारित्र्य प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट यांसह अनेक दस्तऐवजांची आवश्यकता असते. मात्र येथील सेतू सुविधा केंद्र गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे.
त्यामुळे दूरवर असलेल्या इतर खाजगी सेतू केंद्रांमध्ये ही कामे करावी लागत आहेत. याचाच फायदा घेत खाजगी सेतू सुविधा केंद्रचालक ठराविक दरापेक्षा जास्त दर आकारून ही कामे करून देतात. परिणामी याचा सर्वसामान्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला. त्यांनी वणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. तांत्रिक बाबी दूर करत, हे सेतू केंद्र लवकरात लवकर चालू करण्याची मागणी केली. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, शंकर पिंपळकर, अमोल मसेवार, विजय चोखारे, आकाश काकडे, विलन बोदाडकर, सूरज काकडे, धीरज बगवा, लक्ष्मण गाताडे, योगेश माथनकर, कृष्णा कुकडेजा, योगेश कदम यांच्या सह अन्य मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
Comments are closed.